ठाणे : ‘लोकसत्ता’ आयोजित स्वरोत्सव या संगीत कार्यक्रमातील ‘वाद्यरंग’ हे पहिले पुष्प गुरुवारी सायंकाळी ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात गुंफण्यात आले. या कार्यक्रमात सहभागी कलाकारांनी हिंदी आणि मराठी चित्रपटातील अजरामर गाण्यांचे सादरीकरण केले. यावेळी उपस्थित रसिक या वाद्यरंगात रंगून गेले. या कार्यक्रमाची सुरवात महेश खानोलकर, निलेश परब, अर्चीस लेले, अमर ओक, सत्यजित प्रभू, दत्ता तावडे या सर्व वादक कलाकारांनी ‘प्रथम तुला वंदितो’ या गीतस्वरांनी केली. यानंतर महेश खानोलकर यांनी व्हायोलिनवर ‘भेटी लागे जीवा’ अभंग सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. या अभंगानंतर सत्यजीत प्रभू यांनी ‘थकले रे नंदलाला’ या गाण्यांचे सूर हार्मोनियमवर छेडत रसिकांची मने जिंकली. यानंतर या कलाकारांनी ‘गोरी गोरी पान फुलासारखी छान’, ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘हम मिले तुम मिले’, ‘सवार लू’ यांसारखी विविध गाणी आपल्या वाद्यांच्या आधारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचविली. तसेच सर्व सहभागी कलाकारांनी बासरी, तबला, ढोलकी, अकॉर्डियन, ड्रम सेट, व्हायोलिन, मेंडोलिन, पियानिका या वाद्यांची प्रेक्षकांना ओळख करून देत त्यांचे गाण्यांमधील महत्व समजावून सांगितले. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी यावेळी गायक आणि शब्द यांच्यामधील अंतर समोर यावे यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी सर्व सहभागी कलाकारांचा ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग आणि ‘केसरी टूर्स’च्या संगीता पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सहप्रायोजक : केसरी टूर्स रूणवाल ग्रुप : दोस्ती ग्रुप ल्लरुस्तमजी ग्रुप