ठाणे : दहशतवाद्यांनी केलेल्या पहलगाम हल्ल्याचा सुड उगवण्यासाठी भारत सरकारने पाकिस्तानच्या विरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले आहे. त्यामुळे भारतीय सेनेच्या रक्षणासाठी आणि विजयासाठी आज, शनिवारी सायंकाळी सात वाजता ठाण्यातील समतानगर येथील दुर्गा माता मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या हल्ल्याचा सुड उगवण्यासाठी भारत सरकारने पाकिस्तानच्या विरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले असून या माध्यमातून भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ९ ठिकाणी दहशतवादी तळांवर मोठी कारवाई केली. त्या कारवाईनंतर पाकिस्तान आता भारताच्या दिशेने आणि सीमेवर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले करत आहे. मात्र, या ड्रोन हल्ल्य़ाला भारतीय लष्करही चोख प्रत्युत्तर देत आहे. एकप्रकारे भारताचे पाकिस्तानसोबत युद्ध सुरू झाले आहे. आपले वीर जवान सीमेवर आपल्यासाठी लढत आहेत. काही जवानांना वीरगती प्राप्त झाली आहे.
देशासाठी सीमेवर लढणारे जवान सुरक्षित राहोत यासाठी देशवासीय प्रार्थना करत आहेत. तसे संदेश समजमाध्यमांवर प्रसारित करत आहेत. असे असतानाच आता भारतीय सेनेच्या रक्षणासाठी आणि विजयासाठी आज शनिवारी सायंकाळी सात वाजता ठाण्यातील समतानगर येथील दुर्गा माता मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. आपली जबाबदारी आणि कर्तव्य समजून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित असावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. या आरतीनंतर ” भारतीय सेना विजयी हो ” अशा घोषणा दिल्या जाणार आहेत.