अंबरनाथः राज्यातील पहिले नगरपालिका संचलित स्पर्धा परिक्षा केंद्र अंबरनाथ शहरात सुरू करण्यात आले आहे. यासाठीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता येत्या काही दिवसात हे केंद्र सुरू होणार आहे. यासाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेची निवड करण्यात आली आहे. हे राज्यातील सातवे केंद्र ठरणार आहे. १०० विद्यार्थी क्षमता असलेल्या या केंद्रात पहिल्या वर्षात २५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. अंबरनाथ शहरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षांची तयारी करण्यासाठी प्रशिक्षण केंद्र असावे या भावनेतून कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्पर्धा परिक्षा केंद्राचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानुसार अंबरनाथ नगरपालिकेने शिवाजी नगर भागात स्पर्धा परिक्षा केंद्र उभारण्यात आले. एकूण ९ हजार ४८० चौरस फुटाची जागा उपलब्ध झाली. हे केंद्र चालवायचे कुणी याबाबत प्रश्न होता. यासाठी खासगी संस्थांचा विचार करण्यात आला. मात्र आता राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार आता या केंद्र चालवण्याची जबाबदारी या संस्थेकडे असणार आहे. पुढील तीन वर्षाच्या मुदतीसाठी संस्थेकडून हे केंद्र चालवले जाणार असून त्यासाठी प्रशिक्षण संस्था आणि प्रशासक अंबरनाथ नगरपालिका यांच्यात नोंदणीकृत सामजस्य करार करण्यात आला आहे. हे केंद्र राज्यातील सातवे केंद्र ठरले आहे. यापूर्वी राज्यात असलेली सहा केंद्र ही महापालिका संचलित होती. नगर पालिका संचलित अंबरनाथचे स्पर्धा परिक्षा केंद्र राज्यातील पहिलेच केंद्र ठरले आहे. हेही वाचा >>> दिव्याचे सिंगापूर करण्याच्या वक्तव्यावरून शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के भाजपच्या रडारवर निवासी केंद्र या केंद्राची विद्यार्थी क्षमता १०० असून पहिल्या वर्षात येथे २५ विद्यार्थांचे प्रवेश करण्यात आले आहेत. राज्यभरातून सामायिक निवड चाचणी प्रक्रियेतून या २५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आल्याची माहिती अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली आहे. पुढील वर्षात ५० तर तिसऱ्या वर्षात पूर्ण क्षमतेने केंद्र चालवले जाईल. येथे प्रशिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्थाही केली जाणार आहे. येथे एक वर्षाचा अभ्यासक्रम असेल. संस्थेला तीन वर्षांसाठी केंद्र संबंधित संस्थेला तीन वर्षांसाठी केंद्र देण्यात आले आहे. येथे राज्यभरातील तज्ञ शिक्षण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. येथील मनुष्यबळाचा पूर्ण खर्च अंबरनाथ नगरपालिका करणार आहे. तर देखभाल दुरूस्तीची जबाबदारीही पालिका प्रशासनाची असणार आहे. विद्यार्थ्यांचे विद्यावेतन शासनाकडून दिले जाणार आहे.