कल्याण: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभुळ येथील जलशुध्दीकरण केंद्रातील यंत्रणेचे व बारवी गुरुत्ववाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम करावयाचे असल्याने या दोन्ही केंद्रातून गुरुवार (ता. ८) रात्री १२ ते शुक्रवारी (ता. ९) रोजी रात्री १२ वाजेपर्यंत कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, तळोजा आणि परिसरातील ग्रामीण भाग, डोंबिवली, तळोजा औद्योगिक क्षेत्राला होणारा पाणी पुरवठा २४ तास बंद ठेवण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे, अशी माहिती एमआयडीसीचे डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर आव्हाड यांनी दिली.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अंबरनाथ तालुक्यातील जांभुळ येथील जलशुध्दीकरण केंद्रातून कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, तळोजा परिसरातील निवासी आणि औद्योगिक भाग, या जलवाहिनीच्या परिसरात येणाऱ्या खेड्यांना एमआयडीसीकडून सुमारे दररोज ९५० ते अकराशे दशलक्ष लीटरपर्यंत पाणी पुरवठा केला जातो. बारवी गुरुत्व वाहिनीच्या माध्यमातून हा पाणी पुरवठा केला जातो. या जलवाहिन्यांवर अनेक ठिकाणी व्हाॅल्व्हमधून पाण्याची गळती, काही ठिकाणी दोन जलवाहिन्यांमधून पाण्याची सततची गळती होत राहते. ही गळती हळूहळू मोठी होत जाऊन अनेक वेळा पाण्याचा दाब वाढून गळतीच्या ठिकाणी जलवाहिनी फुटून हजारो लीटर पाणी फुकट जाते.

तसेच, जांभुळ जलशुध्दीकरण केंद्रात उल्हास नदीतून दररोज हजारो लीटर कच्चे पाणी उचलले जाते. कच्चे पाणी उचलून त्यावर शुध्दतेची प्रक्रिया करताना अनेक वेळा जलशुध्दीकरण केंद्रातील यांत्रिक यंत्रणा जाम होते. त्यात काही बिघाड होण्याची शक्यता असते. गाळ, कचरा या यंत्रणेत अडकून पडतो. पावसाळ्यापूर्वी ही कामे करणे आवश्यक असल्याने एमआयडीसीने गुरुवार, शुक्रवार जांभुळ जलशुध्दीकरण केंद्र आणि बारवी गुरुत्व वाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ असा २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे या जलवाहिन्यांवरून पाणी पुरवठा होणाऱ्या शहरांना, औद्योगिक विभागांना कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिक, उद्योजकांना एक दिवस पुरेल इतका पाणी साठा करून ठेवावा, असे आवाहन एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.