ठाणे : बुधवारी झालेल्या ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला काही विभागांचे प्रमुख उपस्थित नसल्यामुळे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी संताप व्यक्त केला. या बैठकीला गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस द्या आणि त्यास उत्तर दिले नाहीतर माझ्या समोर हजर करा, असे आदेश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात अधिकारी पालकमंत्र्यांना जुमानत नसल्याची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> कल्याण डोंबिवली पालिकेतील १७६ सफाई कामगार ‘साहेबी’ थाटात, घनकचरा विभागात हजर होण्याचे आयुक्तांचे आदेश

ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक तीन महिन्यांनी आयोजित करण्यात येते. या बैठकीत जिल्ह्यात सुरु असलेल्या प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेण्यात येतो आणि त्याचबरोबर संथगतीने सुरु असलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी उपाययोजना करण्यात येतात. काही प्रकल्पांना आवश्यक वाढीव निधीची गरज असेल तर त्यासही मंजुरी देण्यात येते. ही बैठक जानेवारी महिन्यात होणार होती. परंतु कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुक आचारसंहितेमुळे ही बैठक होऊ शकलेली नव्हती. आचारसंहिता संपताच बुधवारी ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई हे जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांचा आढावा घेत असताना, अनेक विभागाच्या अधिकाऱ्यांना सद्यस्थितीत सुरु असलेल्या कामांबाबतची माहिती देता आली नाही. सोनाळे आणि शिवळी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीचे काम सुरु असून त्यापैकी सोनाळे गावातील आरोग्य केंद्राचे काम पावसाळ्यापुर्वी पुर्ण होईल का अशी विचारणा पालकमंत्री देसाई यांनी केली. त्यावरही अधिकाऱ्यांना उत्तर देता आले नाही आणि या बांधकामाच्या ठिकाणी अधिकारी गेलेच नसल्याचे समोर आले. या शा‌ळा इमारतीच्या स्लॅबचे काम आताच पुर्ण झालेले असून यामुळे हे काम होणे शक्य नसल्याचा दावा आमदार कथोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. तर, कामांची योग्य माहिती मिळत नसल्याबाबत पालकमंत्री देसाई यांनी नाराजी व्यक्त केली. तंत्रशिक्षण विभागाच्या कामाचा आढावा घेत असताना या विभागाचे प्रमुखच उपस्थित नव्हते. अशाचप्रकारे इतरही काही विभागांचे प्रमुख बैठकीला उपस्थित नसल्याचे निदर्शनास येताच देसाई यांनी संताप व्यक्त केला. बैठकीला गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना दिले. या बैठकीला गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस द्या आणि त्यास उत्तर दिले नाहीतर माझ्या समोर हजर करा, असे आदेश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

हेही वाचा >>> ठाणे जिल्ह्यात होणार अत्याधुनिक शाळांची निर्मिती; पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे प्रशासनाला आदेश

ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य शासनाकडून नियोजन समितीला ६१८ कोटींचा निधी मिळाला होता. त्यापैकी ६५ टक्के निधी आतापर्यंत खर्च झालेली आहे. उर्वरित निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करण्यात येणार असून त्यासाठी संथगतीने असलेल्या प्रकल्पांच्या कामाची गती वाढविण्यात येणार आहे. यंदा राज्य शासनाकडून नियोजन समितीला ८५० कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच बैठकीला गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस द्या आणि त्यास उत्तर दिले नाहीतर माझ्या समोर हजर करा, असे आदेश दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

“करोना महासाथीच्या काळात घनकचरा विभागातील जे सफाई कामगार अन्य विभागात सेवेत आहेत, त्यांनी तातडीने घनकचरा विभागात मूळ पदावर हजर व्हावे. जे कामगार हजर होणार नाहीत त्यांचे वेतन रोखण्यात यावे.”

. भाऊसाहेब दांगडे, आयुक्त

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister shambhuraj desai angry on officers for not attending planning committee meeting zws
First published on: 08-02-2023 at 17:22 IST