शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे शिष्य मानले जाणारे खासदार राजन विचारे यांनी नववर्षात शिवसैनिकांना भावनिक साद घालणारे एक पत्र समाजमाध्यमावर प्रसारित केले आहे. यामध्ये त्यांनी शिंदे गटावर कडाडून टीका केली आहे. एकनिष्ठ शिवसैनिकांनो.. हे नवे वर्ष अन्याय सहन करायचे नाही. घमेंडखोर गनीमांना त्यांची औकाद दाखवायला आपण कमी पडणार नाही याचा मला सार्थ विश्वास आहे. खुर्चीसाठी रातोरात आमदार पळवून आपल्या ५६ वर्षांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खूपसला, आपली अस्मिता असलेले धनुष्यबाण चिन्ह गोठवले.. आपल्या हक्काचे प्रकल्प बाहेरील राज्यात नेऊन मराठी तरूणांना बेरोजगार केले, महापुरूषांचा अवमान होत आहे… असा महाराष्ट्र पाहताना आपले हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे हे जिथे कुठे असतील त्यांना किती वेदना होत असतील, असेही यात म्हटले आहे. हेही वाचा- ठाणे : शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांवर गुन्हा दाखल होताच भाजपाच्या जखमी पदाधिकाऱ्यावरही विनयभंगाचा गुन्हा दाखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे खासदार राजन विचारे हे दिवंगत आनंद दिघे यांचे शिष्य मानले जातात. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर ठाण्यात मोठ्याप्रमाणात शिवसेनेचे पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले होते. असे असले तरी खासदार राजन विचारे हे अद्यापही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. शनिवारी रात्री उशीरा राजन विचारे यांनी दृकश्राव्य माध्यमातून एक पत्र समाजमाध्यमावर प्रसारित केले. या पत्रात त्यांनी सुरुवातीलाचा “प्रति, एकनिष्ठ शिवसैनिकांनो”.. असा उल्लेख केला आहे. “मनगटावर बांधलेल्या शिवबंधनाशी एकनिष्ठ राहणाऱ्या शिवसैनिकांना जय महाराष्ट्र”.. असेही यात म्हटले आहे. हेही वाचा- ठाण्यात शिंदे गट आणि भाजपाचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर नव्या वर्षात पदार्पण करताना आपण जुने वाद, भांडण विसरायचे असतात. वाद-भांडण असती तर विसरूनही गेलो असतो.. पण अन्याय, जखमा, स्वार्था सत्ताकारण यांना कसं विसरायचं.. रातोरात आमदारांना पळवून आपल्या ५६ वर्षांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खूपसला, आपल्या हक्काचे प्रकल्प बाहेर नेऊन मराठी तरूणांना बेरोजगार केलं… आपली अस्मिता असणारे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले, ईडीचा धाक दाखवून शिवसेना फोडली, राज्याचा पालक म्हटलं जात तोच मुख्यमंत्री पदाचा गैरवापर करून भूखंडाचे गैरव्यवहार करतो, राज्यात महापुरूषांचा अवमान होत आहे, सच्चा शिवसैनिक अन्यायाविरोधात आवाज उठवतो तेव्हा त्याला अमानुष मारहाण केली जाते. खोटे गुन्हे दाखल केले जातात. केंद्रात, राज्यात, कर्नाटकात त्यांचीच सत्ता असताना या महाराष्ट्राला कोणी वाली नाही… असा महाराष्ट्र पाहताना आपले हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे हे जिथे कुठे असतील त्यांना किती वेदना होत असतील, असेही यात म्हटले आहे. हेही वाचा- ठाणे: आमदार प्रसाद लाड यांच्याविषयी आक्षेपार्ह विधानाप्रकरणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल येणारे नवीन वर्ष हे अन्याय सहन करण्याचे नाही. आपल्या रक्ताच्या थेंबा-थेंबात आक्रोश आहे… तो तसाच उफाळून दे.. कारण या आक्रोशाची आज महाराष्ट्राला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला गरज आहे.. घमेंडखोर गनीमांना त्यांची औकाद दाखवायला आपण कमी पडणार नाही याचा मला सार्थ विेश्वास आहे… अशी भावनिक साद त्यांनी घातली. पत्राचे शेवट करताना राजन विचारे यांनी “आपला निष्ठावान शिवसैनिक सहकारी” असा उल्लेख केला आहे. हा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमावर प्रसारित होत आहे.