ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील वडपे-माजिवडा प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई नाशिक महामार्गावर खारेगाव टोलनाका उभारण्यात येणार असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर आता राष्ट्रवादीने (शरद पवार गट) आक्रमक भूमिका घेतली आहे. या टोलनाक्यावर ठाणेकरांना टोलमुक्ती न दिल्यास आम्ही हा टोल नाका बंद पाडू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिला आहे.

मुंबई नाशिक महामार्गावरील माजिवडा ते वडपे या प्रकल्पाचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून येत्या काही महिन्यात या मार्गिकेच्या निर्माणाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई-नाशिक महामार्ग आणि समृद्धी महामार्गावरून मुंबईच्या दिशेने होणारा प्रवास वेगवान होणार असला तरी वाहन चालकांना टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. खारेगाव येथील जुन्या टोलनाका भागात नव्याने टोलनाका उभारण्याचे काम सुरु झाले आहे. त्यास राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने विरोध केला आहे. याबाबत मनोज प्रधान यांनी सांगितले की, १९९८ या वर्षी खारेगाव टोलनाका सुरु झाला होता.

टोलवसूली विरोधात अनेकदा आंदोलन देखील झाले होते. २०१७ मध्ये हा टोलनाका कायमस्वरुपी बंद करण्यात आला होता. त्यामुळे ठाणे ते भिवंडी, कल्याण आणि कल्याण, भिवंडी, नाशिक, उरण जेएनपीए येथील हजारो हलकी, जड-अवजड वाहन चालकांना टोलपासून मुक्तता मिळाली होती. टोल वसूली बंद होऊन अवघे ९ वर्ष पूर्ण होत असतानाच, माजिवडा-वडपे प्रकल्प बांधून पूर्ण झाल्यानंतर टोल वसूली केली जाणार आहे. या वसुलीला राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचा प्रखर विरोध असणार आहे. वाहन खरेदी करतानाच कर घेतला जात असतानाच पुन्हा टोल आकारणी करून आधीच महागाईने पिचलेल्या नागरिकांची पिळवणूक करण्याचा हा प्रयत्न आहे. या टोल टॅक्समुळे फक्त सामान्य वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा वागणार नाही तर प्रवास खर्च वाढल्याने व्यापाऱ्यांकडून जीवनावश्यक वस्तूंचेही दर वाढविले जाणार आहेत.

त्यामुळेच आमचा या टोल नाक्याला विरोध आहे. मात्र, हे सरकार पाशवी बहुमताचा आधार घेऊन टोलनाक्याचा विरोध चिरडून टाकणार आहे, यात शंका नाही. त्यामुळे १४ ऑक्टोबर २०२४ मध्ये ज्याप्रमाणे मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर टोलमुक्ती देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर हा टोल नाक्यावर ठाणेकरांसाठी टोलमुक्ती द्यावी.

दरम्यान, खारीगाव किंवा मुंब्रा येथील नागरिकांना घोडबंदर गाठायचे असेल तर महामार्ग हा उत्तम पर्याय आहे. मात्र, ठाणे शहरातच यायचे असताना किंवा पुन्हा परतीचा प्रवास करताना दोन वेळा टोल भरावा लागणार आहे. किंवा टोल टाळण्यासाठी द्राविडी प्राणायाम करीत कळवा, कोर्टनाका, जांभळी नाका, खोपट जंक्शन, माजीवडा येथील वाहतूक कोंडीत अडकावे लागणार आहे. त्यामुळे पर्यायी रस्ता तयार करून द्यावा . म्हणूनच ठाणेकरांना टोलमुक्ती द्यावी; खारीगाव टोल नाक्यावर जर ठाणेकरांना टोलमुक्ती देण्यात आली नाही; तर, आम्ही हा टोल नाका बंद पाडू, असा इशाराही मनोज प्रधान यांनी दिला आहे.