ठाणे : जात, धर्म, पंथ आणि प्रांत या सगळ्याच्या वरती जाऊन प्रत्येक भारतीयांच्या मनात होते की २६ निष्पाप नागरिकांचे प्राण घेतले गेले, त्याचा बदला घेतलाच पाहिजे. त्यामुळे भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूर या कामगिरीचे कौतुक करावे, तेवढे थोडेच. ये तो सिर्फ झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है , अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. यात २६ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर देशभरातून संतप्त भावना व्यक्त केल्या जात होत्या. गेल्या १५ दिवसांत या मुद्द्यावरून देशभरातील वातावरण तापले होते. दहशवाद्याना जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. मोदी यांनी काही कठोर निर्णय घेऊन पाकिस्तानची पाणी कोंडी केली होती.
त्यामुळे भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्ध होईल, अशी चिन्ह दिसू लागली होती. असे असतानाच, मंगळवारी मध्यरात्रीनंतर अर्थात ७ मे रोजी पहाटे भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या परिसरातील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला.या एअर स्ट्राईकला भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव दिले. ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर सर्वच सस्तरातून भारतीय लष्करावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे. अशाच प्रकारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधत यावर प्रतिक्रिया दिली आहे.
जिथे जिथे अतिरेक्यांची गुप्त स्थान होती, त्या त्या स्थानावर जाऊन भारतीय सैन्याने हल्ला केला. भारतीय सैन्याच्या या कामगिरीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. पाकिस्तानला धडा शिकवायचा हे प्रत्येक भारतीच्या मनात होते, जात धर्म पंथ प्रांत या सगळ्याच्या वरती जाऊन प्रत्येक भारतीयांच्या मनात होता की २६ निष्पाप नागरिकांचे प्राण घेतले गेले, त्याचा बदला घेतलाच पाहिजे. त्यामुळे भारतीय सैन्याने जे काही केले, त्यांचे कौतुक करावे, तेवढे थोडच आहे, असे आव्हाड म्हणाले. प्रत्येक भारतीयांची छाती अभिमानाने फुलून आली आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही भारतीय सैन्याचे अभिनंदन करतो. तसेच पाकिस्तान जेव्हा जेव्हा वाकुल्या दाखवण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा तेव्हा त्यांची मस्ती जिरवली गेलीच पाहिजे, असे आव्हाड म्हणाले.