कल्याण: शहापूर तालुक्यातील कसारा येथील शिवाजीनगर मधील नागरी वस्तीमधील कुटुंबीयांवर २० ते २५ जणांनी अचानक लाकडी दांडके, लोखंडी सळया घेऊन दहा वर्षापूर्वी हल्ला केला होता. या हल्ल्यात कुटुंबीयांतील महिलांना हल्लेखोरांकडून बेदम मारहाण झाली होती, अशी तक्रार कसारा पोलीस ठाण्यात पीडित महिलेकडून दाखल करण्यात आली होती. याप्रकरणात आरोपींविरुध्द सबळ पुरावे उपलब्ध करून देण्यास तपास यंत्रणा कमी पडल्याने कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश मंगला मोते यांनी नऊ आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.
सुलोचना साधू जाखेरे (६३), विकास साधू जाखेरे (३६), प्रकाश यशवंत भारमल (५४), महेस नामदेव गिलांडे (३९), अशोक यशवंत भारमल (४७), दिनकर साधू जाखेरे (४२), सिताराम काशिनाथ कोरडे (६८), कैलास गोविंद मराडे (४३), लिलाबाई यशवंत भारमल (८६) अशी निर्दोष सुटका झालेल्या आरोपींची नावे आहेत. हा खटला न्यायालयात चालू असतानाच्या काळात साधू संतू जाखेरे यांचे निधन झाले होते.जनाबाई जगन जगताप यांनी या हल्ल्याप्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात सप्टेंबर २०१४ मध्ये तक्रार केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली होती. कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हा खटला मागील दहा वर्षापासून सुरू होता.
तक्रारदार महिला जनाबाई जगताप यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले होते, की सप्टेंबर २०१४ मध्ये आपण कसारा शिवाजीनगर भागात घरी असताना अचानक गावातील २० ते २५ जणांनी आपल्या घरात घुसून कुटु्ंबीयांवर हल्ला चढविला. हल्लेखोरांकडे लोखंडी सळया, दांडके होते. या मारहाणीत आम्ही घरातील आणि परिसरातील महिला जखमी झाल्या.या हाणामारीच्या वेळी आपल्या गळ्यातील सोनसाखळी चोरीला गेली. राणी जगताप यांना दगडाने मारहाण करण्यात आली.
कसारा पोलिसांनी दाखल गुन्ह्याप्रमाणे आरोपींना अटक करून तपास केला होता. या प्रकरणी कल्याण जिल्हा न्यायालयात हा खटला सुरू होता. न्यायालयाने याप्रकरणातील तपासात अनेक त्रृटी काढल्या. तीन साक्षीदारांच्या साक्षीत एकवाक्यता आढळून आली नाही. सोनसाखळी चोरीविषयीची साद्यंंत माहिती तक्रारदार देऊ शकल्या नाहीत.उलट तपासणीच्यावेळी तक्रारदार, साक्षीदार यांच्या माहितीत सातत्य आणि एकवाक्यता दिसून आली नाही. त्यामुळे आरोपींविरुध्द सबळ पुरावा नसल्याने न्यायालयाने नऊ आरोपींची या हल्ला प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. या हल्लाप्रकरणामुळे कसारा गावात अनेक दिवस तणावाचे वातावरण होते.