ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामामुळे दिवा, मुंब्रा, कळवा, कोलशेत आणि वागळे इस्टेट परिसरातील काही भागांचा पाणी पुरवठा शुक्रवार बंद राहणार आहे. या बंदनंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. यामुळे या सर्वच भागातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २७ लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन ६१६ दशलक्षलीटर इतका पाण्याचा कोटा मंजुर आहे. प्रत्यक्षात शहराला दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यापैकी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा १३५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा दुरुस्ती कामासाठी बंद राहणार आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रातील अत्यंत महत्वाचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी कटाई नाका ते ठाणे दरम्यान गुरुवार, ८ मे रोजी रात्री १२ ते शुक्रवार, ९ मे रोजी रात्री १२ या कालावधीत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा – मानपाडा आणि वागळे (काही भागात) प्रभाग समिती क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मार्फत पाणी पुरवठा केला जातो.
यामुळे दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ व ३१ चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागामध्ये, वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, असे पालिका प्रशासनाने कळविले आहे. या पाणी बंदच्या कालावधीत पाणी काटकसरीने व जपून वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.