ठाणे : कोपरी येथील धोबीघाट भागातील जलकुंभाची मुख्य जलवाहिनी सॅटीसच्या कामात बाधित होत आहे. या जलवाहिन्यांच्या स्थलांतरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे कोपरी परिसराचा पाणी पुरवठा शुक्रवारी (२७ मे) बंद राहणार आहे. या बंदनंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. यामुळे कोपरीवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

धोबीघाट परिसरातील जलकुंभाची ३०० मीमी व्यासाची मुख्य वितरण जलवाहिनी धनेश्वर मंदिर येथे सॅटीस कामात बाधित होत आहे. ही जलवाहिनी स्थलांतरीत करून सॅटीस कामातील अडथळा दूर करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. शुक्रवारी सकाळपासून हे काम हाती घेतले जाणार आहे. या कामामुळे शुक्रवारी (२७ मे) सकाळी ९ ते शनिवारी (२८ मे) सकाळी ९ यावेळेत कोपरी परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

हेही वाचा : कल्याण डोंबिवली पालिकेच्या ‘स्मार्ट’ ऑनलाइन सुविधेत तांत्रिक दोष?, नागरिक हैराण

कोपरी परिसरातील सिध्दार्थ नगर, शांतीनगर, चंदणी कोळीवाडा, साईनगरी, साईनाथ नगर मस्ताननगर, ठाणेकर वाडी, कोपरी गाव, धोबीघाट, नातु परांजपे कॉलनी, स्टेशन परिसर, आदर्शनगर, सुदर्शन कॉलनी, आनंदनगर, गांधीनगर, कानेवाडी, सिध्दीविनायक नगर, केदारेश्वर नगर तसेच नवजीवन सोसायटी परिसर या भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामुळे येथील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.