डोंबिवली : ‘पहलगाम हल्ल्याचा बदला ‘ऑपरेशन सिंदूर’ या विशेष लष्करी मोहिमेतून भारतीय लष्कराने मंगळवारी रात्री घेतला. याबद्दल आम्हा कुटुंबीयांना खूप समाधान आणि आनंद वाटला. हा एक हल्ला झाला. दहशतवादाचा नायनाट होईपर्यंत असे हल्ले भारताने सुरूच ठेवले पाहिजेत,’ अशी प्रतिक्रिया पहलगाम हल्ल्यात मृत पावलेल्या पर्यटक कुटुंबातील हर्षद संजय लेले यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
जम्मू काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या डोंबिवलीतील संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांंना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार मारले. पर्यटक कुटुंबीय दहशतवाद्यांना ‘आम्ही काहीही केले नाही. आम्हाला सोडा’, असे आर्जव करत असताना दहशतवाद्यांनी अतिशय क्रूरपणे आमच्या घरातील कर्त्या पुरुषांना मारले. त्यामुळे भारताने मंगळवारी मध्यरात्री पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवर केलेली लष्करी कारवाई खूप महत्त्वाची आहे. मृत पर्यटकांच्या आत्म्याला या कारवाईने शांती, समाधान मिळाले असेल, असा विश्वास हर्षद संजय लेले यांनी व्यक्त केला.