कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ३ लाख वीजग्राहकांना त्यांच्या घराचा खंडित केलेला वीजपुरवठा पूर्ववत करून घेण्याची संधी मिळत आहे. त्यासाठी या ग्राहकांना तालुका व जिल्हा स्तरावर शनिवारी (१२ मार्च) आयोजित लोक अदालतीत सहभाग घ्यावा लागणार आहे. नुकत्याच शासनाकडून जाहीर झालेल्या विलासराव देशमुख अभय योजनेतील सवलत मिळवत थकबाकीची रक्कम ग्राहकांना भरावी लागणार आहे, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांना लोक अदालतीत सहभागी होण्याबाबत विधी विभागाकडून नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. नोटीस मिळाली नाही तरीही या ग्राहकांना अदालतीत सहभागी होता येईल. एकरकमी थकबाकी भरणाऱ्या कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित उच्चदाब व लघुदाब वर्गवारीतील (कृषिपंप ग्राहक वगळून) ग्राहकांना विलासराव देशमुख अभय योजनेतून व्याज व दंड माफी सोबतच थकीत रकमेत अनुक्रमे ५ व १० टक्के सवलत मिळणार आहे. या योजनेत थकीत रक्कम भरण्यासाठी हप्त्याची सुविधाही उपलब्ध आहे. या सवलतीचा लाभ घेऊन थकबाकीची रक्कम भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करण्यात येईल. ही संधी डावलणाऱ्या संबंधित ग्राहकांवर पुढील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कायमस्वरूपी वीज खंडित ग्राहकांनी जिल्हा व तालुका स्तरावर आयोजित लोक अदालतीत सहभागी होऊन सन्मानाने वीजपुरवठा पुर्ववत करून घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. कल्याण परिमंडलात कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या सुमारे ३ लाख लघुदाब व उच्चदाब ग्राहकांकडे (कृषिपंप वगळून) २५७ कोटी ६७ लाख रुपयांचे वीजबिल व ३४ कोटी ३२ लाख रुपयांचे व्याज थकीत आहे.