ठाणे : ‘लोकसत्ता’ आयोजित स्वरोत्सव या संगीत कार्यक्रमातील ‘ऋतुरंग’ हे दुसरे पुष्प शुक्रवारी ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहात गुंफण्यात आले. या कार्यक्रमात सहभागी कलाकार पंडित सत्यशील देशपांडे आणि आरती अंकलीकर- टिकेकर यांनी विविध रागाधारित बंदिश सादर करत उपस्थित संगीतप्रेमी रसिकांची मने जिंकली. या कार्यक्रमाची सुरुवात पंडित सत्यशील देशपांडे यांनी प्रहरांनुसार गायल्या जाणाऱ्या विविध रागांची श्रोत्यांना थोडक्यात ओळख करून दिली. तसेच स्वरमेळातील विविध पैलू उलगडून सांगत भारतात असणारे प्रत्येक ऋतूनुसार किंवा प्रहरानुसार राग जगाच्या पाठीवर कुठेही नसल्याचे मत त्यांनी आवर्जून व्यक्त केले. आरती अंकलीकर- टिकेकर यांनी बसंत बहार रागातील ‘आयी बसंत की बहार बंदिश’ सादर केली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सत्यशील देशपांडे यांनी मल्हार रागावर आधारित ‘घर मोहे जा’ आणि आरती अंकलीकर- टिकेकर यांनी चैत्र मासाचे सुंदर असे वर्णन करणारी चैती गात रसिकांना रागांच्या एका वेगळय़ाच विश्वाची अनुभूती दिली. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी ऋतुरंग हा कार्यक्रम समाजात जे सुरेल आहे ते सर्व रसिक श्रोत्यांसमोर यावे या हेतूने आयोजित केला असल्याचे मत व्यक्त केले. या संगीत कार्यक्रमाचे निवेदन कुणाल रेगे यांनी केले. सहप्रायोजक : केसरी टूर्स रूणवाल ग्रुप : दोस्ती ग्रुप रुस्तमजी ग्रुप