कल्याण-डोंबिवली या ऐतिहासिक, सांस्कृतिक महानगराचा महत्त्वाचा भूभाग म्हणजे टिटवाळा. गणपती देवस्थानमुळे टिटवाळ्याला महत्त्व आहे. यापूर्वी गाव असलेला हा भाग नागरीकरणामुळे शहरी होत चालला आहे. विविध भागांतील भाविक या ठिकाणी नियमित गणपती दर्शनासाठी येतात. अंगारकी, संकष्टी चतुर्थीला तर या ठिकाणी भाविकांचा महापूर उसळतो. गेल्या अनेक वर्षांतील चित्र पाहिले तर टिटवाळा भागाला पालिकेकडून गावकुसाबाहेरचा भाग म्हणून वागणूक दिली जात आहे. या शहरात रस्ते, पाणी, वीज, उद्याने, बगिचे अशा अनेक नागरी सुविधांचा अभाव आहे. पालिकेची सार्वजनिक सुविधा देणारी अनेक आरक्षणे या भागात आहेत. या आरक्षणांचा विकास करून पालिका प्रशासन हा भाग सुशोभित करू शकते. देशाच्या विविध भागांतून दररोज येथे शेकडो भाविक येतात. त्यांना खड्डेमय रस्त्यांवरून ये-जा करावी लागते. टिटवाळा रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर चोहोबाजूने पाहिले तर तात्काळ हे धार्मिक स्थळापेक्षा उकिरडय़ाचे शहर वाटू लागते. पर्यटनस्थळासारखे वातावरण या भागात असणे आवश्यक आहे. आताची परिस्थिती पाहिली तर टिटवाळा, मांडा भागाच्या परिसरात बेकायदा चाळी, इमले, लॉज उभारण्यात आले आहेत. टिटवाळा परिसराचे आखीव-रेखीव नियोजन असणे आवश्यक होते. तसे नियोजन करण्यात प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी कमी पडले. टिटवाळा स्थानक ते गणेश मंदिर अशी सततची परिवहन सेवा या भागात असणे आवश्यक आहे. या भागात आल्यानंतर रिक्षा, टांगे या साधनांवर भाविकांना अवलंबून राहावे लागते. टिटवाळा परिसरात मोठी गृहसंकुले उभी राहत आहेत. मुंबई, ठाणे परिसरातील नागरिक या ठिकाणी कायम स्वरूपी राहण्यास येत आहेत. त्यांना तशा सुविधा पालिकेने टिटवाळ्यातील मोकळ्या आरक्षित जमिनी, नदी काठचा परिसर विकसित करून द्याव्यात. टिटवाळा हे श्रद्धेबरोबर एक पर्यटनाचे ठिकाण म्हणून विकसित करावे. प्रमोद भानुशाली, निवृत्त बँक अधिकारी