अंबरनाथ : ठाणे जिल्ह्यातील सुमारे ५० लाखांहून अधिक नागरिकांची पिण्याच्या पाण्याची तहाण भागवणाऱ्या अंबरनाथच्या जांभूळ येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जलशुद्धीकरण केंद्रातून तब्बल ३३ लाख ५६ हजार रूपये किमतीच्या वाहिन्या चोरीला गेल्या आहेत. धक्कादायक म्हणजे हा संपूर्ण परिसर प्रतिबंधीत असून संवेदनशील आहे. येथे ३६ सुरक्षा रक्षक आणि एका पोलिसाचीही सुरक्षेसाठी नेमलेला असतो. त्यानंतरही या संवेदनशील परिसरातून एवढी मोठी चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. एवढ्या सुरक्षित जागेत चोरट्यांचा प्रवेश असल्यास येथील पाणी तरी सुरक्षित आहे का असाही प्रश्न उपस्थित होतो आहे. तसेच कुणाच्या आशिर्वादाने किंवा संगनमताने ही चोरी झाली की असाही संशय उपस्थित होतो आहे.

अंबरनाथ आणि कल्याण तालुक्याच्या वेशीवर जांभूळ येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. बारवी धरणातून सोडलेले पाणी उल्हास नदीवर पुढे आपटी बंधारा येथून उचलून ते जांभूळ केंद्रात आणून त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर हे पाणी मोठ्या जलवाहिन्यांच्या माध्यमातून अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, ठाणे, मिरा भाईंदर या महापालिका, तसेच विविध औद्योगिक वसाहतींना पुरवठा केले जाते.

या केंद्रात सर्वसामान्यांना प्रवेश नसून हा भाग प्रतिबंधीत आहे. येथे तब्बल ३६ सुरक्षा रक्षक सुरक्षेसाठी नेमण्यात आले आहेत. कल्याण बदलापूर रस्त्यावरील फॉरेस्ट नाका येथून या केंद्राचे प्रवेशद्वार असून येथे आणि त्यानंतर आत आणखी दोन ठिकाणी सुरक्षा रक्षकांच्या चौक्या आहेत. या केंद्रात गेल्या काही दिवसांपासून नव्या जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. यातील मोठमोठ्या अशा सहा जलवाहिन्या चोरीला गेल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. यात ९ लाख ३६ हजार किमतीचे २ हजार ४०० मिलीमीटर व्यासाचे तीन मीटर लांबीचे आणि १६ मिलीमीटर जाडीच्या २ आणि २४ लाख २० हजार रूपये किंमतीचे १ हजार ८०० मिलीमीटर व्यासाचे, १२ मीटर लांबीचे आणि १२ मिलीमीटर जाडीचे ४ जलवाहिन्या चोरीला गेल्या आहेत. असा एकूण ३३ लाख ५६ हजार रूपये किमतीच्या जलवाहिन्या चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे.

जलवाहिन्या चोरल्या, कुणी नाही पाहिल्या

प्रतिबंधीत क्षेत्रासाठी एमआयडीसी प्रशासनाची मोठी सुरक्षा व्यवस्था आहे. येथे सर्वसामान्यांना प्रवेश नाही. प्रत्येक प्रवेश आणि बाहेर पडण्याची एक प्रक्रिया आहे. अशा स्थितीत सुमारे साडे सात फुट व्यासाच्या अवजड महाकाय जलवाहिन्या चोरीला जाताना कुणीच कशा पाहिल्या नाही, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. विशेष म्हणजे एक दोन नाही तर तब्बल सहा जलवाहिन्या चोरीला गेल्या आहेत.

पुरावेही नष्ट केले ?

एमआयडीसीतील विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात सुरक्षा चौक्यांसमोरच या जलवाहिन्या ठेवण्यात आल्या होत्या. या जलवाहिन्या येथेच कापण्यात आल्या. त्याचे तुकडे तुकडे करून ते चोरण्यात आल्या. सुरक्षा रक्षकांच्या डोळ्यादेखत हा प्रकार धडत होता. वाहिन्यांचे कापकाम झाल्यानंतर त्या ठिकाणी पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी

याबाबत केंद्राचे उपअभियंता अमोल मसुरकर यांना विचारले असता चोरी झाली आहे पण हा स्थापत्य विभागाचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्थापत्य विभागाचे अभियंता अनिल जोगदंड यांना संपर्क केला असता ते उपलब्ध झाले नाहीत. तर अंबरनाथचे कार्यकारी अभियंता रमेश पाटील यांना विचारले असता, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे असे ते म्हणाले. हा सुरक्षेचा विषय असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
फोटो आहेत