शहरात दिवसेंदिवस पाळीव प्राणी असणाऱ्या नागरिकांची संख्या हळूहळू वाढत आहे. या प्राण्यांना त्यांचे मालक रस्त्यावर फिरण्यासाठी घेऊन येतात. मात्र त्यावेळी हे प्राणी रस्त्यावरच विष्ठा करतात. त्यामुळे त्या परिसरात दुर्गंधी आणि स्वछता पसरते. यातील बहुतांश पाळीव प्राण्यांचे मालक तेथील स्वछता करतात. मात्र त्यानंतर हा कचरा टाकायचा कुठे असा प्रश्न त्यांना असतो. यावर उपाय म्हणून ठाण्यातील आर निसर्ग आणि डॉग्स वर्ल्ड इंडिया या संस्थांनी स्कुप पेट पूप हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या प्राथमिक स्तरावर ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह भागातील रस्त्यावर प्राण्यांची विष्ठा टाकण्यासाठी कचरापेट्या बसविल्या आहेत. दहा दिवसांपूर्वी या उपक्रम सुरु करण्यात आला असून पाळीव प्राण्यांच्या मालकांकडूनही याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या काही दिवसात ठाण्यातील विविध रस्त्यांवर अशा पद्धतीच्या कचरापेट्या बसविण्याचा संस्थांचा मानस आहे.

हेही वाचा – डोंबिवली – ठाकुर्ली ते कोपर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सात महिन्यात १२५ जणांचा मृत्यू

शहरातून निघणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका प्रशासन तसेच विविध सामाजिक संस्था विविध उपक्रम राबवित असतात. तसेच ओला कचरा सुका कचरा यांचे वर्गीकरण करणे. कचऱ्यापासून खत निर्मिती करणे. प्लास्टिक कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावणे. यांसारखे अनेक उपक्रम काही सामाजिक संस्था राबवित असतात. या मानवनिर्मित कचऱ्याबरोबरच रस्त्यांवरील प्राण्यांच्या विष्ठेमुळे नागरिकांना अस्वछतेचा आणि दुर्गंधीचा सामना करावा लागतो. यात भटक्या आणि पाळीव प्राण्यांचा देखील समावेश असतो. शहरात श्वान, मांजर यांसारखे प्राणी पाळणाऱ्या नागरिकांची संख्या हळूहळू वाढत आहे. हे नागरिक त्यांचे प्राणी रस्त्यावर फिरण्यासाठी घेऊन येतात. यावेळी हे प्राणी रस्त्याच्या कडेला किंवा मधोमध नैसर्गिक विधी करतात. मात्र यामुळे त्या परिसरात अस्वच्छता पसरते. यातील बहुतांश प्राण्यांचे मालक तो कचरा साफ करताना दिसून येतात. मात्र कचरासाफ केल्यानंतर तो टाकायचा कुठे असा प्रश्न त्यांच्या पुढे असतो. तसेच प्राण्यांच्या विष्ठेत मोठ्या प्रमाणात किटाणू असतात. बराच काळ उघड्यावर ही विष्ठा राहिल्याने त्यातून रोगराई पसरण्याची ही भीती असते. त्यामुळे दैनंदिन कचऱ्यात देखील ते टाकता येत नाही. यावर उपाय म्हणून ठाण्यातील डॉ. लता घनश्यामनानी यांच्या आर निसर्ग आणि प्रमोद निंबाळकर यांच्या डॉग्स वर्ल्ड इंडिया या संस्थांनी स्कुप पेट पूप हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या प्राथमिक स्तरावर ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह भागातील रस्त्यावर प्राण्यांची विष्ठा टाकण्यासाठी ३५ लिटर क्षमतेच्या कचरापेट्या बसविल्या आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. तसेच या भागात येणाऱ्या पाळीव प्राण्यांच्या मालकांडून त्यांच्या प्राण्यांनी केलेला कचरा टाकण्यात येत आहे. तसेच संस्थेच्या वतीने महापालिका प्रशासनाला किमान आठवड्याभरानंतर हा कचरा योग्य ठिकाणी टाकण्याचे निवेदन देण्यात आले आहे. तसेच यासाठी पालिका प्रशासनाने देखील सकारात्मकता दर्शविल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – ठाण्यात गणेशोत्सव मंडळांचा परवानगीच्या ऑनलाईन सुविधेला कमी प्रतिसाद ; २४७ पैकी ९४ मंडळांना उत्सवासाठी परवानगी

शहरभरात उपक्रम राबविण्याचा मानस
आर निसर्ग या संस्थेतर्फे शहरात कोणत्या रस्त्यांवर पाळीव प्राणी फिरायला येतात. अशा रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार शहरातील चौदा ठिकाणे आढळून आली. यातील काशिनाथ घाणेकर ते खेवरा सर्कल या भागात या उपक्रमाची सुरवात करण्यात आली आहे. शहरात स्वछता रहावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला नागरिकांचा आणि पालिका प्रशासनाचा देखील उत्तम प्रतिसाद मिळाल्यास सर्वेक्षण पूर्ण झालेल्या रस्त्यांवर देखील या कचरापेट्या बसविण्यात येणार असल्याचे संस्थेच्या सहसंस्थापिका डॉ. लता घनश्यामनानी यांनी सांगितले.

प्राण्यांच्या मालकांची स्वछतेची इच्छा असते. मात्र मात्र प्राण्यांनी रस्त्यावर केलेली विष्ठा टाकण्यासाठी सुविधाच नसल्याने मोठी अडचण होते. यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच महापालिका प्रशासनाने देखील नित्यनेमाने या उपक्रमात सहभाग दर्शविला तर उपक्रम तडीस जाईल.– प्रमोद निंबाळकर, संस्थापक, डॉग्स वर्ल्ड इंडिया, ठाणे</strong>