अंबरनाथः मंगळवारी झालेल्या पावसात अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील वीज पुरवठा विस्कळीत झाला होता. विविध ठिकाणी वाऱ्यामुळे झाडे, वृक्ष विजवाहिन्यांच्या संपर्कात आल्याने बिघाड झाला होता. त्यामुळे दुरूस्तीसाठी मोठा वेळ गेला. परिणामी अंबरनाथमध्ये पहाटे चारपर्यंत तर बदलापुरात रात्री दोन वाजेपर्यंत विविध ठिकाणी वीज पुरवठा खंडीत होता. त्याचा परिणाम शहरातील पाणी पुरवठ्यावरही झाला. तर नागरिकांच्या झोपेचे खोबरे झाले. बुधवारी सकाळीही विविध ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सकाळी दहा वाजल्यापासून विश्रांती घेत पाऊस पडत होता.

मंगळवारी ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांना पूर्वमोसमी पावसाचा फटका बसला. सायंकाळच्या सुमारास पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले. रात्री नऊच्या सुमारास ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर शहरात सोसाट्याचा वारा सुटला. त्यानंतर सर्व शहरांत वीज पुरवठा खंडित झाला. काही वेळातच रिमझिम पावसाला सुरुवात झाली. काही काळ काही सरी बरसल्यानंतर काही काळ पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र दहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा पावसाला सुरुवात झाली. पडघा येथील महापारेषण विद्युत पुरवठा केंद्रात बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. वीज पुरवठा सुरळीत होण्यास एक ते दीड तासांचा कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण ग्रामीण आणि आसपासच्या भागात पहाटेपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता.

अंबरनाथ शहरात विविध भागात पहाटे चारवाजेपर्यंत वीज पुरवठा खंडीत झाला होता. तर बदलापुरात काही ठिकाणी रात्री दिडच्या सुमारास वीज पुरवठा सुरळीत झाला होता. तर काही भागात दोन वाजता वीज पुरवठा सुरळीत झाला. परिणामी नागरिकांच्या झोपेचे खोबरे झाले. याचा सर्वाधिक फटका पाणी पुरवठ्याला बसला. बहुतांश ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा आल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पहिल्याच पावसात वीज आणि पाण्याची व्यवस्था बिघडल्याचे दिसून आले.

बुधवारी सकाळीही बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर आणि आसपासच्या परिसरात सरी कोसळल्या. सकाळी दहाच्या सुमारास रिमझीम पावसाला सुरूवात झाली. तर अकराच्या सुमारास अंबरनातमध्ये पुन्हा जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

समाज माध्यमांवर टीकेची झोड

महावितरणाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून काही माजी लोकप्रतिनिधी शहरातील नागरिकांना वीज पुरवठा खंडीत झाल्याची, दुरूस्तीच्या कामाची माहिती देत होते. मात्र महावितरणाकडून नेहमीप्रमाणे कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे महावितरणाच्या कार