संजीव जयस्वाल यांचे पालिकांना निर्देश ठाणे : ठाणे व पालघर जिल्ह्यातील २०५० पर्यंतच्या लोकसंख्येला लागणाऱ्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी आराखडा सादर करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांनी सोमवारी ठाण्यातील सर्व पालिकांना दिले. तसेच मराठवाडा वॉटर ग्रीडप्रमाणे मुंबई महानगर प्रदेशातील धरणांचा वॉटर ग्रीड करता येईल का, याचा विचार करण्याच्या सूचनाही त्यांनी केली. ठाणे जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्हा कृती दलाची स्थापना केली होती. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी या कृती दलाची पहिली बैठक झाली. ठाणे आणि आसपासच्या परिसरातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी कृती दल लवकरच आराखडा सादर करणार आहे. जलसंपदा विभागाने छोट्या छोट्या प्रकल्पांवर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.