ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त तसेच प्रशासक पदावर नियुक्ती झाल्यानंतर अभिजीत बांगर यांनी शुक्र‌वारी दुपारी पालिका मुख्यालयात येऊन आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतली. प्रत्येक शहरात संधी आणि आव्हाने असतात. या दोघांची एकत्रित सांगड घालून शहराच्या समस्या सोडवायच्या असतात. तशाचप्रकारे ठाणे शहरातील समस्या सोडविण्यासाठी काम करणार असल्याचे आयुक्त बांगर यांनी यावेळी सांगितले. तसेच शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येऊ शकतील, याचा अभ्यास करून त्याआधारे कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. अनधिकृत बांधकामाच्या समस्येबाबत अभ्यास करुन त्यावर मार्ग काढला जाईल आणि वृक्ष लागवडीचा वेगळा प्रयोग ठाण्यातही करण्याचा प्रयत्न असणार आहे, असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागेवर नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांची राज्य सरकारने नियुक्ती केली आहे. शुक्रवारी दुपारी बांगर यांनी ठाणे महापालिका मुख्यालयात येऊन डाॅ. शर्मा यांच्याकडून आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतली. यानंतर त्यांनी पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद सांधला. प्रत्येक शहरात संधी आणि आव्हाने असतात. या दोघांची सांगड घालून शहराच्या समस्या सोडवायच्या असतात. गेल्या काही वर्षात ठाणे शहराचा विकास झपाट्याने झाला असून हे शहर माझ्यादृष्टीने वैशिष्टयपुर्ण आहे. या शहरात काही संधी आणि आव्हाने आहेत. संधी अशी आहे की, हे शहर पारंपारिक आहे.

हेही वाचा : अभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार

या शहराबद्दल नागरिकांना अभिमान असून ते शहरातील कामांकरिता नेहमी सज्ज असतात. त्यांचा शहराच्या विकासात सहभाग असतो. या नागरिकांमध्ये शहराबद्दलचा अभिमान आणखी दृढ कसा करता येईल, या दृष्टीने काम करणार आहे. तसेच शहरातील आव्हानांबद्दल पहिल्याच दिवशी सांगता येणार नाही. पण, या शहरात खुप आव्हाने आहेत. संधी आणि आव्हाने यांची एकत्रित सांगड घालून शहरातील समस्या सोडवायच्या असतात. त्याचप्रकारे ठाणे शहरातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे शहराचे असल्यामुळे आम्हाला त्यांची चांगली मदतच होणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असल्यामुळे त्यांच्या करवी शहराच्या विकासासाठी शासनाकडून निधी मिळू शकतो. त्यांच्याकडे दूरदृष्टी असून त्याबाबत आपल्याला समजले तर निश्चितच शहराचा विकास करण्यात काहीच अडचणी येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : पालिकेचे नियम कर्मचाऱ्यांच्या शिस्तीसाठी पण, त्रास मात्र सर्वसामान्य ठाणेकरांना

ठाणे शहरात वाहतूक कोंडीची समस्या जाणवत आहे. काही ठिकाणी अरुंद रस्त्यांमुळे तर काही ठिकाणी इतर कारणांंमुळे वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी नेमकी कशामुळे होते, याचा अभ्यास करून त्यावर पर्याय शोधून कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. देशातील कुठलीही सार्वजनिक वाहतुक व्यवस्था ही नफा ना तोटय़ा या तत्वावर चालविण्यात येते. परंतु त्यातही नागरिकांना सेवा आणि सुरक्षा कशाप्रकारे देता येईल, याचा विचार केला जातो. त्यामुळे ठाणे परिवहन सेवा सुधारण्यासाठी अभ्यास करून त्याप्रमाणे काही बदल करण्यात येतील. विजेवरील बसगाड्या येणार असतील तर त्याकरिता चार्जींग स्थानके उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील. अनधिकृत बांधकामाच्या समस्येबाबत अभ्यास करुन त्यावर मार्ग काढला जाईल. वृक्ष लागवडीचा वेगळा प्रयोग ठाण्यातही करण्याचा प्रयत्न असणार आहे. शहरात अर्बन फॉरेस्ट म्हणून विकसित करणे अपेक्षित असून त्याचबरोबर वृक्ष उन्मळून पडू नयेत म्हणून देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Problems of thane city will solved as soon as possible statement thane municipal commissioner abhijit bangar tmb 01
First published on: 30-09-2022 at 18:02 IST