भूमाफियांविरोधात डोंबिवली ते मुंबई पदयात्रा काढणाची घोषणा अखेर प्रा. अय्यर यांनी मागे घेतली. तशी विनंती त्यांना सरकारी अधिकाऱ्यांनी केली होती. या प्राध्यापकाच्या मागणीनुसार सोसायटीच्या राखीव मैदानावर झालेल्या बांधकामाला तहसीलदारांनी सील ठोकले. सोसायटीच्या पोहोच रस्त्याचे काम येत्या डिसेंबपर्यंत करून देऊ, असे आश्वासन दिले. प्राध्यापक के. एस. अय्यर यांनी पायी दौरा रद्द करावा यासाठी त्यांची मनधरणी करण्यात आली.
तीन वर्षांपासून प्रा. अय्यर सागाव येथील रविकिरण सोसायटीत राहतात. त्यांचा स्वत:चा बंगला आहे. सोसायटीसाठी खेळाचे राखीव मैदान आहे. या मैदानाच्या जागेवर विकासकाने सोसायटी, एमएमआरडीए, जिल्हाधिकारी यांची कोणतीही परवानगी न घेता एक इमारत उभारली आहे. या प्रकरणी सोसायटीने न्यायालयात दावा दाखल केला आहे. या कामाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ही स्थगिती असताना विकासकाने सोसायटी सदस्यांना न जुमानता मैदानात गाळे बांधून जागा हडप करण्याचा प्रयत्न केला. या विरोधात प्रा.अय्यर यांनी मानपाडा पोलीस, महसूल विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची शासकीय यंत्रणांनी फारशी दखल घेतली नाही. या बांधकामांच्या तक्रारी केल्या म्हणून अय्यर यांना मारहाण करण्यात आली ठार मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत.