ठाणे – जिल्ह्यातील सुमारे सर्वच तालुक्यांमध्ये मंगळवारी रात्री अचानक झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे २४ हेक्टरवरील आंबा बागांचे नुकसान झाले आहे. यामध्ये काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहे तरी काही ठिकाणी काढणीसाठी आलेली फळे गाळून पडली आहेत. यामध्ये अधिक नुकसान भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांचे झाले आहे. याबाबत कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले आहे.
मे महिन्याच्या तीव्र उन्हाचा तडाखा सोसत असताना मंगळवारी रात्री अचानक जिल्ह्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे वीज देखील खंडित झाल्याने शहरी तसेच ग्रामीण भागात अंधारात राहावे लागले. जिल्ह्यात पावसासह वादळी वाऱ्याचे प्रमाण अधिक असल्याने विविध ठिकाणी आंबा पिकाचे चांगलेच नुकसान झाले आहे.
आंब्याच्या हंगाम सुरु झाल्यानंतर एप्रिल आणि मे महिन्यात कोकणातून येणाऱ्या हापूस आणि इतर आंब्याची जास्त विक्री होते. तर मे महिन्याच्या मध्यानंतर ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर आणि भिवंडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाणाऱ्या आंबे बाजारात दाखल होत असतात. याच पद्धतीने आता येत्या आठवड्यापासून येथील आंबे बाजारात दाखल होणार आहेत. मात्र यापूर्वी जिल्ह्यातील सुमारे ८० शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला आहे.
मंगळवारी रात्री झालेल्या या पावसामुळे भिवंडी, मुरबाड आणि शहापूर तालुक्यात पावसामुळे आंबा पिकाचे खूप मोठे नुकसान झाले. तर भिवंडी मध्ये ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झाले असून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी कृषी विभागाकडून पंचनामे करण्याची सुरुवात करण्यात आली आहे.
मंगळवारी रात्री झालेला पाऊस (मिमीमध्ये)
ठाणे – ११.९
कल्याण – ९.२
मुरबाड – १२.९
भिवंडी – १२.६
शहापूर – १०.९
उल्हासनगर – ६.० अंबरनाथ – ३.३