शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी ठाण्याच्या टेंभी नाक्यावर सुरु केलेल्या बहुचर्चित नवरात्री उत्सवास रश्मी ठाकरे यांनी गुरुवारी दिलेल्या भेटी दरम्यान उद्धव ठाकरे समर्थकांनी केलेले शक्ती प्रदर्शन, त्यानंतर घेण्यात आलेली महाआरती आणि स्वर्गीय दिघे यांचे वास्तव्य असलेल्या आनंद आश्रमात दिलेली भेटी दरम्यान घडलेल्या घडामोडींमुळे ठाण्यातील राजकारण पुन्हा एकदा तापू लागले आहे. या उत्सवाचे आयोजक असलेल्या मंडळामार्फत ठाकरे कुटुंबियांना कोणतेही निमंत्रण नव्हते अशी चर्चा आहे. असे असताना रश्मी यांच्यासोबत टेंभी नाका येथे आलेल्या मुंबई, नवी मुंबईतील महिला कार्यकर्त्यानी देवीच्या मंडपात केलेली राजकीय घोषणाबाजी आणि महाआरतीसाठी निश्चित असलेल्या वेळांचे केलेले उल्लंघनाचा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी उचलून धरला आहे. ठाण्यातील या उत्सवास एरवी भेट देताना आनंद मठाकडे ढुंकूनही न पहाणाऱ्या ठाकरे कुटुंबियांना आता बरे शक्तीस्थळ आठवू लागले आहे, असा टोला शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना लगावला.

हेही वाचा >>> ठाणे : तोतया पोलीस अटकेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला ठाणे जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिंदे गटात आले आहेत. शिवसेना ही काही प्रायव्हेट लिमीटेड कंपनी नाही अशी टिका करत मुख्यमंत्री शिंदे यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच आनंद दिघे यांचा वारसा आम्ही चालवत असल्याचा दावा वेळोवेळी केला आहे. हे करत असताना स्वर्गीय दिघे यांनी ठाण्यात सुरु केलेल्या दहिहंडी आणि नवरात्री उत्सवाच्या आयोजनाची जबाबदारीही शिंदे यांनी पुर्णपणे स्वत:च्या खांद्यावर घेतल्याचे पहायला मिळत आहे. दिघे यांचे वास्तव्य असलेले आनंदाश्रम, त्यांच्या वेगवेगळ्या संस्था, उत्सव मंडळ त्यावरील पदाधिकारी देखील शिंदे यांच्या सोबत असल्याने टेंभी नाक्यावरील सर्व प्रकारच्या उत्सवांवर तसेच कार्यक्रमांवर शिंदे यांची पकड यंदाही अधिक मजबूत होताना दिसून आले. या पार्श्वभूमीवर शिवसेना कुणाची याप्रमाणे धर्मवीत आनंद दिघे यांचे खरे वारसदार कोण यावरुनही ठाण्यातील राजकीय वर्तुळात शिंदे आणि ठाकरे गटाकडून स्पर्धा सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे. या स्पर्धेतूनच गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे कुटुंबियांच्या टेंभी नाक्यावर भेटींमध्ये वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे यांच्या पाठोपाठ नवरात्री उत्सवाच्या निमीत्ताने रश्मी ठाकरे यांनी टेंभी नाक्यास दिलेली भेट आणि मुंबई, नवी मुंबईतील महिला समर्थकांसह केलेले शक्तीप्रदर्शन त्यामुळेच चर्चेत आले असून शिंदे समर्थकांनी यावरुन ठाकरेंवर पुन्हा एकदा टिका केली आहे.

हेही वाचा >>> कल्याण डोंबिवलीच्या होत असलेल्या बदनामीला वैतागले आमदार राजू पाटील, म्हणाले बाहेरच्यांनी लुडबुड…

आता बरे दिघेसाहेब आठवले …
टेंभी नाका येथील उत्सव मंडळाचे अध्यक्षपद एकनाथ शिंदे यांच्याकडे असून यंदा मंडळाकडून ठाकरे कुटुंबियांना निमंत्रण पाठविण्यात आले नव्हते अशी चर्चा आहे. असे असताना या उत्सवास भेट देताना ठाकरे समर्थक महिला कार्यकर्त्यांचे मुंबई, नवी मुंबईतील जथ्थे रश्मी यांच्यासोबत टेंभी नाका येथे आल्याचे पहायला मिळाले. येथील मंडळामार्फत दिवसातून दोन वेळा देवीची आरती घेतली जाते. यावेळाही निश्चित केल्या जातात. मात्र रश्मी ठाकरे यांच्यासाठी ठाकरे समर्थकांनी या वेळां व्यतिरीक्त खास महाआरतीचे आयोजन केल्याचा आरोप आता शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. हे करत असताना मंडपाच्या आवारात दिलेल्या राजकीय घोषणाबाजीवरुन आता दोन्ही गटांमधून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. दरम्यान एरवी ठाण्यात सण, उत्सवांसाठी येणाऱ्या ठाकरे कुटुंबियांना आता बरे शक्तीस्थळ आणि आनंदआश्रमांना भेटी द्याव्याशा वाटू लागल्या असा सवाल शिंदे गटाचे प्रवक्ते आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. तसेच दिघे साहेबांनी आयोजित केलेल्या उत्सवात मुंबई, नवी मुंबईतील महिला कार्यकर्त्यांसह येऊन घोषणाबाजी कशासाठी असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यापुर्वी ठाण्यात आलेल्या रश्मी ठाकरे शक्तीस्थळावर कितीवेळा गेल्या असा प्रश्न म्हस्के यांनी उपस्थित केला.

टेंभी नाक्यावर देवीच्या दर्शनासाठी आलेले सर्व भक्त होते आणि त्या सर्वानी आरती केली. ते शक्तीप्रदर्शन नव्हते. इथे केवळ देवीची पुजाअर्चा करण्यात आली होती. कोणतेही पक्ष प्रवेश येथे झाले नाहीत.-चिंतामणी कारखानीस,शिवसेना ठाणे जिल्हा प्रवक्ते