कल्याण- खड्ड्यांमुळे प्रवाशांचे जीव जात आहेत, रिक्षा चालवताना पाठ, मणक्याचे आजार सुरू झाले असताना खड्डे बुजविण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश देऊनही टंगळमंगळपणा करत असल्याने त्याचा निषेध करण्यासाठी सोमवारी सकाळी डोंबिवलीत रिक्षा चालकांनी पालिकेच्या ह प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढला. कल्याण पूर्वेत अडीवली-ढोकळी, व्दारली येथे संतप्त नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले. खड्ड्यांमुळे रस्त्यावरून चालताना येत नाही. वाहन चालकांना वाहन व्यवस्थित चालविता येत नाही. पादचाऱ्यांच्या अंगावर खड्डयातील पाणी उडवून वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. अशा परिस्थितीत सहनशक्ती संपलेला डोंबिवली, कल्याणमधील नागरिक सोमवारी रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाब विचारत होता. डोंबिवली पश्चिमेत रिक्षा चालक मालक संघटनेचे उपाध्यक्ष शेखर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्षा चालकांनी ह प्रभाग कार्यालयावर रिक्षांसह मोर्चा काढला. गेल्या आठवड्यात रिक्षा चालकांनी खड्डे भरा, अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा पालिकेला दिला होता. ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी येत्या सहा दिवसात खड्डे भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे आश्वासन रिक्षा संघटनेला दिले होते. आश्वासन देऊन आठवडा उलटला तरी डोंबिवली पश्चिमेतील रस्त्यांवरील खड्डे पालिकेकडून भरले जात नाहीत. त्याचा निषेध करण्यासाठी सोमवारी सकाळी रिक्षा चालक मालक संघटनेचे सदस्य उपाध्यक्ष जोशी यांच्या नेतृत्वाखाली ह प्रभाग कार्यालयासमोर धडकले. अधिकाऱ्यांच्या दालनात जाण्याचा प्रयत्न मोर्चेकरांनी केला त्यांना सुरक्षा रक्षकांनी रोखले. पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ यावेळी घोषणा देण्यात येत होत्या. खड्डे भरण्यासाठ १५ कोटीची तरतूद असुनही तो निधी गेला कोठे, असा प्रश्न रिक्षा चालकांकडून उपस्थित केला जात होता. साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील, उपअभियंता लिलाधर नारखेडे, साहाय्यक अभियंता महेश गुप्ते मोर्चेकरांना सामोरे गेले. खड्डे भरणीची कामे प्रभागात सुरू आहेत. पावसाळामुळे सिमेंटने खड्डे भरले जात नाहीत. पाऊस कमी झाला की रेडिमिक्सचा वापर करून रस्ते सुस्थितीत केले जाणार आहेत. पश्चिमेतील श्रीधर म्हात्रे चौक ते गरीबाचापाडा रस्त्याचा वरील थर काढून तो नव्याने करण्याचे नियोजन आहे, असे अभियंता गुप्ते यांनी सांगितले. कल्याण पूर्वेत रस्ता रोको कल्याण पूर्वेतील अडीवली ढोकळी, व्दारली गाव, मलंगगड रस्त्याची खड्डयांमुळे चाळण झाली आहे. चेतना विद्यालय ते मलंग गड रस्ता दररोज संध्याकाळी वाहतूक कोंडीने गजबजलेला असतो. खड्डे पडूनही पालिका अधिकारी खड्डे बुजवत नसल्याने अडीवली परिसरातील संतप्त नागरिक सोमवारी रस्त्यावर उतरले. त्यांनी अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी केले. उत्स्फूर्तपणे सुरू या आंदोलनात वाहन चालक, रहिवासी, विद्यार्थी सहभागी झाले. आंदोलनाची व्याप्ती वाढताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पालिका अभियंता महेश गुप्ते यांनी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांना या भागातील खड्डे भरण्याचे नियोजन केले आहे. पाऊस कमी झाला की ही कामे प्राधान्याने केली जाणार आहेत असे लेखी पत्र दिले. त्यानंतर रहिवासी रस्त्यावरून बाजुला झाले. आंदोलनाच्या वेळी या भागात कोंडी झाली होती. डोंबिवली पश्चिमेतील खड्डे येत्या दोन दिवसात भरले नाहीत तर पालिका मुख्यालयात शहर अभियंता सपना कोळी यांच्या दालनात रिक्षा चालकांनी बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. रिक्षा चालकांना खड्ड्यांमुळे होणारा त्रास, नुकसानीचा प्रशासन विचार करत नसल्याने उपोषणाचा निर्णय घेण्यात आला आहे.- शेखर जोशी ,उपाध्यक्ष, रिक्षा चालक संघटना, डोंबिवली