डोंबिवली: येथील ज्येष्ठ लेखिका आणि जयसिंगपूर येथील मराठी जैन साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा लीलाताई शहा यांचे सोमवारी येथे वृध्दापकाळाने निधन झाले. त्या ८७ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. बाल साहित्यापासून ते पर्यावरण, पाणी प्रश्न, अंधश्रध्दा अशा अनेक विषयांवर त्यांनी लेखन केले. कथा, कविता, कादंबऱ्या, ललित साहित्य, वृत्तपत्रीय लेखन त्या शेवटपर्यंत करत होत्या. विविध विषयांवरील ६८ पुस्तके, २०० हून अधिक गाणी त्यांनी लिहिली आहेत. बाल साहित्याचा ३२ पुस्तकांचा त्यांचा संग्रह प्रसिध्द आहे. मूळच्या सोलापूरच्या असलेल्या लीलाताई ४० वर्षापासून डोंबिवलीत वास्तव्याला होत्या. त्यांची पहिली कविता ‘लोकसत्ता’ मध्ये प्रसिध्द झाली होती. वयाच्या १७ व्या वर्षापासून त्या लिखाण करत होत्या. साहित्यिक लिखाणामुळे त्यांना कुसुमाग्रज, विजय तेंडुलकर, डाॅ. यु. म. पठाण यांचे साहित्यिक मार्गदर्शन मिळाले. सोलापूरच्या ‘श्राविका’ मासिकाच्या संपादक मंडळावर त्या २५ वर्ष होत्या. ताराबाई मोडक बाल साहित्य पुरस्कार, शासनाचे तीन उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, आदर्श डोंबिवलीकर अशा अनेक पुरस्काराने त्या सन्मानित होत्या.