वसई-विरार महापालिकेची परवानगी नाही विरारच्या बोळिंज येथे शापूरजी पालनजी कंपनीच्या जॉयविले या गृहनिर्माण प्रकल्पाच्या आलिशान कार्यालयाला कुठलीच परवानगी दिली नसल्याचे वसई-विरार महापालिकेने माहिती अधिकारात दिलेल्या उत्तरात सांगितले. त्यामुळे याप्रकरणी कंपनीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी वसई पर्यावरण संवर्धक समितीने आयुक्तांकडे केली आहे. कंपनीने मात्र अशी परवानगी असल्याचा दावा केला आहे. विरार पश्चिमेच्या बोळिंज येथे मुंबईच्या बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी शापूरजी पालनजी यांच्या जॉयविले या गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू आहे. या गृहनिर्माण प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आहे. पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करून भराव केल्याने परिसरातील गावात पूरपरिस्थिती निर्माण होत असल्याचा वसई पर्यावरण संवर्धक समितीचा आरोप आहे. या गृहनिर्माण प्रकल्पाच्या ठिकाणी असलेल्या कंपनीचे आलिशान कार्यालय बेकायदा असल्याचा आरोप समितीने केला होता. याबाबत समितीने महापालिकेकडे माहिती अधिकारात कार्यालयास माहिती आहे का याची विचारणा केली होती. महापालिकेने माहिती अधिकारात उत्तर देताना या कार्यालयास कुठलीही परवानगी दिली नसल्याचे सांगितले. ज्या अर्थी महापालिकेने कुठलीही परवानगी दिली नाही त्या अर्थी हे कार्यालय अनधिकृत आहे हे स्पष्ट होते, असे समीर वर्तक यांनी सांगितले. त्यामुळे विकासकावर गुन्हे दाखल करावेत आणि बांधकाम निष्काषित करून प्रकल्पच रद्द करावा, अशी मागणी वर्तक यांनी आयुक्त सतीश लोखंडे यांच्याकडे केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन पडताळणी केली जाईल, असे वसई विरार महापालिकेचे आयुक्त सतीश लोखंडे यांनी सांगितले. कंपनीने आरोप फेटाळले शापूरजी पालनजी कंपनीने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. आम्हाला महापालिकेने ऑक्टोबर २०१७ मध्ये परवानगी दिली असल्याचा दावा कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित सातर्डेकर यांनी केला. आमचा संपूर्ण प्रकल्प कायदेशीर आहे. मुळात गृहप्रकल्पाच्या ठिकाणी असलेले कार्यालय (साइट ऑफिस) हे तात्पुरते असते. प्रकल्प पूर्ण झाल्यावर ते पाडले जाते, तरीही आम्ही परवानगी घेतली आहे. पालिकेला सादर केलेल्या नकाशात कार्यालयाचा उल्लेख केलेला आहे, असे ते म्हणाले. आम्ही सर्व प्रक्रिया कायदेशीरच करतो. बेकायदा काहीच नाही, असे कंपनीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी गौरव भुतानी यांनी सांगितले. समितीचे आंदोलन या प्रकल्पासाठी मातीभराव करण्यात आला आहे. या भरावामुळेच आणि बांधकामामुळे बोळिंज, नानभाट आणि नंदाखाल या तीन गावांत पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप वसई पर्यावरण समितीचा असून त्यांनी या प्रकल्पाविरोधात आंदोलन पुकारले आहे. या कार्यालयास परवानगी दिली नसल्याचे सांगितले. कुठल्याही प्रकल्पाच्या ठिकाणी असलेल्या अशा कार्यालयांना (साइट ऑफिस) परवानगी असते. शापूरजी पालनजी कंपनीतर्फे आमच्याकडे कार्यालयाला परवानगी मागणारा अर्ज आलेला आहे. त्यांनी परवानगी न घेता कार्यालय बांधले आहे. त्यामुळे आता दंड आकारून ते नियमित करता येईल. - संजय जगताप, नगररचनाकार, वसई-विरार महापालिकेचा नगररचना विभाग