ठाणे: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कालच आमची युती असल्याचे स्पष्ट केले आहे. ज्येष्ठ नेते जेव्हा अशाप्रकारचा निर्णय घेतात, तेव्हा आमच्यासारख्या गल्लीतल्या नेत्यांनी आपल्या मर्यादा ओळखायला पाहिजे, असा टोला शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी भाजप आमदार संजय केळकर यांना लगावला आहे. आपले मुख्यमंत्री असताना टीका करणाऱ्यांनी आपल्या मतदारसंघात काय केले, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
डोंबिवलीमधील भाजपचे पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर विनयभंगचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शिंदेची शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत वाद उफाळून आला असतानाच भाजपचे आमदार संजय केळकर यांनी ठाणे, कल्याण आणि पालघर हे मतदार संघ भाजपचे असल्याचे विधान केले आहे. तसेच भाजपाशिवाय या जिल्ह्यांमध्ये कोणीही निवडून जाऊ शकणार नाही, असे सांगत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेला अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. त्यास आता शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रतिउत्तर देत केळकर यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे सरकार दहा महिन्यांपूर्वी सत्तेत आले. या गोष्टी बहुतेक आमदार केळकर यांना पटलेल्या नाहीत. त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून नेहमी हे दिसून येते, असा टोला त्यांनी लगावला आहे. केळकरांचे बोलण एवढे गंभीर घेतले नाही पाहिजे. कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कालच आमची युती असल्याचे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंदुत्ववादी तसेच हिंदुत्वाचा विचार मांडणारे नेते आहेत. म्हणूच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जे हिंदुत्वाच सरकार हव होत, ते आम्ही स्थापन केल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये सांगितले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेते जेव्हा अशाप्रकारचा निर्णय घेतात, तेव्हा आमच्यासारख्या गल्लीतल्या नेत्यांनी आपल्या मर्यादा ओळखायला पाहिजे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.




हेही वाचा >>>डोंबिवलीत बनावट आधारकार्डच्या आधारे सीमकार्ड विक्री करणाऱ्या महिलेला अटक
आज सत्तेचे फायदे अनेकांना झालेले आहेत, रविंद्र चव्हाण हे बांधकाम मंत्री झालेले आहेत. शिवसेना असेल किंवा भाजपा असेल सगळ्यांनाच सत्तेचा फायदा झाला आहे. खासदर श्रीकांत शिंदे हे तरुण खासदार आहेत, हजारो करोडो रुपयांची काम त्यांनी त्यांच्या मतदारसंघात केली आहेत, रेल्वेची प्रश्न मार्गी लावले आहेत, असे सांगत आपले मुख्यमंत्री असताना टीका करणाऱ्यांनी आपल्या मतदारसंघात काय केले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तरुण मुलाला प्रोत्साहन दिल पाहिजे, असे वाईट वाटून नाही घेतले पाहिजे. निवडणुकीमध्ये दोन्ही पक्ष एकत्र येऊन काम करतात. दोन्ही पक्षांची ताकद असते. ठाणे कल्याण पालघर कोणाची ताकद होती, हे सगळ्यांना माहित आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. आज आपण टीका करीत आहात. पण, मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यावेळीची परिस्थिती, ते वातावरण तेव्हाचा इतिहास आपण तपासला किंवा आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला तर तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि शिवसैनिकांनी घेतलेले कष्ट आठवले तर अशी वक्तव्य होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.