कल्याण: स्थळ- मातोश्री, कलानगर, मुंबई. कल्याणमधील ज्येष्ठ शिवसैनिक विजय ऊर्फ बंडय़ा साळवी, मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिंदे यांच्या बंडखोरीनंतर मातोश्रीवर समोरासमोर बसलेले. बंडखोरीनंतरच्या संघटनात्मक विषयावर साळवी, मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात चर्चा सुरू असतानाच, अचानक साळवी यांना बंडखोर एकनाथ शिंदे यांचा फोन आला. उद्धव ठाकरे आणि साळवी यांची नजरानजर झाली आणि ठाकरे यांनी फोन कोणाचा ते ओळखले. ‘‘तुमच्या बोलण्यात माझा अडसर नको. तुम्हाला बोलताना कोंडल्यासारखे वाटू नये म्हणून थोडा वेळ बाजूच्या खोलीत जातो. तुम्ही दिलखुलास बोला,’’ असे साळवी यांना सांगून उद्धव बाजूच्या दालनात गेले. शिंदे यांनी आपण घेतलेली भूमिका आणि त्या भूमिकेसंदर्भात साळवी यांना विचारणा केली, ‘‘आपण शिवसेनेत राहणार आहोत. ज्या संघटनेने मोठे केले ती संघटना सोडण्याचा विचार मनात येऊ शकत नाही,’’ असे शिंदे यांना सांगितले. त्या वेळी शिंदे यांनी ‘मीही शिवसेनेतच आहे,’ असा प्रतिप्रश्न केला. त्या वेळी साळवी यांनी उद्विग्न होऊन ‘‘शिंदेसाहेब, आपण निष्ठावान शिवसैनिकासारखे वागला नाहीत. आपले चुकलेच आहे. त्यामुळे तुमच्याबरोबर येऊ शकत नाही,’’ असे शिंदे यांना खडेबोल सुनावले. संभाषण संपल्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा साळवी बसलेल्या दालनात आले. त्या वेळी शिंदे काय बोलले याविषयी चकार शब्द न विचारता ठाकरे यांनी पक्षाची रणनीती या विषयांवर चर्चा केली.