आयुक्तांसोबत स्मार्ट सिटीबाबत चर्चा

स्मार्ट शहराच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या महत्वाच्या घटकांना तांत्रिक सहाय्य देण्याच्या दृष्टीने संगणक क्षेत्रातील ‘एचपी’ एंटरप्रायजेस या आंतरराष्ट्रीय कंपनीने सहमती दर्शवली आहे. या शिवाय ठाणे महापालिकेच्या स्मार्टसिटी अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांना अर्थसहाय्य देण्याची तयारीही दर्शविली आहे. एचपी चे अधिकारी यांनी मंगळवारी ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन त्यांच्याशी स्मार्ट सिटीच्या उपक्रमाविषयी विस्तृत चर्चा केली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराविषयीचे प्रत्यक्षिके सादरीकरणानंतर याविषयीच्या सामंजस्य कराराची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

बैठकीमध्ये एचपी या आंतरराष्ट्रीय कंपनीच्यावतीने पाणी पुरवठा, नागरी सुरक्षितता, नागरी गरीबीचे उच्चाटन करणे, सरकार ते नागरिक संपर्क व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य यंत्रणा, नागरी सुविधा याबाबत आवश्यक ते तांत्रिक साहाय्य पुरविण्याबाबत सहमती दर्शविली. तसेच आवश्यकता पडल्यास काही स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी सुलभ अर्थसाहाय्य देण्याची तयारी त्यांनी दर्शविली. बैठकीत पाणीपुरवठा, महिला व मुलांची सुरक्षितता, घनकचरा व्यवस्थापन, वाय-फाय सिटी या महत्वाच्या घटकांविषयी चर्चा झाली.

सध्याच्या काळात उपलब्ध असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्षात कशा पद्धतीने अंमलबजावणी करता येईल याचे कंपनीच्यावतीने सादरीकरण केल्यानंतर लगेचच सामजंस्य कराराची प्रक्रिया पूर्ण करता येईल, असे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले. स्मार्ट सिटी अंतर्गत एचपी या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या तंत्रज्ञानाचा ठाणे शहरासाठी निश्चितपणे उपयोग होऊ शकणार आहे. या बैठकीला या बैठकीला मुख्यमंत्र्याचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ दिवसेकर, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, एचपीई फ्यूचर सिटीजचे भारतातील प्रमुख आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख एम. लक्ष्मीनारायण राव, कंट्री सेल्स मॅनेजर कमल कश्यप, बिझनेस हेड रवींद्र रानडे, एचपी फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे सचिन देशमुख, उपायुक्त संजय निपाणे, संदीप माळवी, अतिरिक्त नगर अभियंता अनिल पाटील, डिलिव्हरी चेंज फाऊंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.