राज्यसेवा परीक्षेत राज्यात आठवी; अंबरनाथकरांकडून शुभेच्छांचा वर्षांव वडिलांच्या अकाली निधनाने हरपलेले पित्याचे छत्र आणि घरची बेताची परिस्थिती असूनही आपल्या अफाट जिद्दीच्या जोरावर अंबरनाथच्या स्नेहा उबाळेने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात आठवा येणाचा मान मिळवला आहे. उपजिल्हाधिकारी पदावर राज्यात ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे संपूर्ण अंबरनाथमधून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षांव सुरू आहे. अंबरनाथ पश्चिमेतील नवीन भेंडीपाडा परिसरात राहणाऱ्या स्नेहाचे शालेय शिक्षण अंबरनाथ येथील महात्मा गांधी विद्यालयातून पूर्ण झाले. पुढे तिने उल्हासनगरच्या चांदीबाई मनसुखानी महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील पदवी घेतली. मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. देशसेवेच स्वप्न पाहताना २०११ साली पहिल्यांदा स्नेहाने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. मात्र त्यात अपयश आल्याने ती पुन्हा जिद्दीने अभ्यासास लागली. या काळात तिने सार्वजनिक बांधकाम विभागात साहाय्यक पदाची नोकरी मिळवली. मात्र तेवढय़ावर न थांबता तिने आपला अभ्यास सुरूच ठेवला. आपल्या गुणवत्तेच्या जोरावर तिने बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेत प्रवेश मिळवला. यातूनच राज्यसेवा परीक्षेत हे यश मिळवले आहे. स्नेहाच्या वडिलांच्या निधनानंतर तिची पूर्ण जबाबदारी तिच्या आई व काकांनी पार पाडली. तिची आई सध्या एका मिलमध्ये काम करते. काकांचा आधारही हरपल्यानंतर आई आणि काकीने तिला सर्वतोपरी सहकार्य केले. यात माझा आत्येभाऊ संदीप भराडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केल्याचे स्नेहाने पत्रकारांशी बोलताना सांगितले. मेहनत आणि कुटुंबाच्या सहकार्यातून यश मिळाल्याचे समाधान असल्याच्या भावना तिने या वेळी व्यक्त केल्या. मुलींमध्ये दुसरी राज्य लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेत स्नेहा उबाळेने आठवा क्रमांक मिळवला आहे. इतकेच नव्हे तर मुलींमध्ये उपजिल्हाधिकारी पदासाठी दुसरी येण्याचा मानही तिला मिळाला आहे. या यशामुळे शहरभर स्नेहाचे कौतुक होत आहे.