महाराष्ट्र राज्य एस.टी. कामगार संघटनेने त्यांच्या मागण्यांसाठी येत्या मंगळवारपासून सामूहिक रजा आंदोलन तसेच आमरण उपोषण करण्याची नोटीस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला बजावली होती. परंतु सध्या उन्हाळी हंगाम सुरू असून आंदोलन करून प्रवाशांना वेठीस धरणे योग्य नाही. यामुळे महामंडळाने हे आंदोलन बेकायदेशीर ठरविले आहे. तसेच कर्मचाऱ्यांचे सामूहिक रजेचे सर्व अर्ज नामंजूर करण्यात आलेले आहेत. जे कर्मचारी या आंदोलनात सहभागी होतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आगार व्यवस्थापकांनी सांगितले आहे. २५ ते २७ एप्रिल या कालावधीत जे कर्मचारी गैरहजर राहतील त्यांच्या एका दिवसाच्या गैरहजेरीकरिता आठ दिवसांचा पगार कपात करण्यात येणार आहे. या काळात आगाराचे जे किमी रद्द होणार आहेत, त्याची सर्वस्वी जबाबदारी कर्मचाऱ्यांची राहील. यामुळे या कालावधीत एकाही कर्मचाऱ्याने गैरहजर राहू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.