कल्याण- नोकरीतील बारा वर्षाचा सेवाकाळ पूर्ण झालेल्या महाराष्ट्रातील शिक्षकांना महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचा उपक्रम बुधवारपासून सुरू झाला. महिनाभराच्या या प्रशिक्षणासाठी राज्यातील सुमारे ९५ हजार शिक्षकांनी नोंदणी केली आहे. प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवसापासून अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने सहभागी शिक्षक हवालदिल आहेत.

राज्य शिक्षण मंडळाने स्वता हे प्रशिक्षण न घेता बाह्यस्त्रोताव्दारे माहिती व तंत्रज्ञानातील एका कंपनीला हे काम दिले आहे. प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या शिक्षकांना मंडळाकडून प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी एक जुळणी (लिंक), एक गुप्त संकेतांक पाठविण्यात आला आहे. एक उपयोजन(ॲप) शिक्षकांना स्थापित करून घ्यायचे आहे. प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी शिक्षकांना मंडळाकडून जुळणी आली नाही. उपयोजन स्थापित होत नाही. स्थापित झाले तरी ते सुरू होत नव्हते. देखभालीसाठी उपयोजन(ॲप) बंद राहणार आहे. असा संदेश प्रशिक्षण पडद्यावर झळकत होता, अशा तक्रारी शिक्षकांनी केल्या.

यापूर्वी ही प्रशिक्षण प्रत्यक्ष उपस्थितीने जिल्हावार घेतली जात होती. या प्रशिक्षणासाठी प्रति शिक्षक दोन हजार शुल्क आकारण्यात आले आहे. अशाप्रकारे यापूर्वी कधीही शुल्क आकारण्यात आले नव्हते. आता शुल्क आकारूनही कोणतीही सुविधा शिक्षकांना नाही. उलट मनस्ताप सहन करावा लागत आहे, अशी माहिती शिक्षकांनी दिली. या प्रशिक्षणाबद्दल तक्रार करायची कोणाकडे, या प्रशिक्षणाचा समन्वयक कोण याची कोणतीही माहिती शिक्षकांना नसल्याने शिक्षक वर्ग गोंधळून गेला आहे.

सहभागी अनेक शिक्षक तंत्रस्नेही नाहीत. ते या सगळ्या नवख्या प्रकाराने गोंधळले आहेत. महामारीची परिस्थितीत नाही. अशा परिस्थितीत ऑनलाईन प्रशिक्षण घेऊन मंडळाला नक्की काय साध्य करायचे आहे. की कोणाचे उखळ पांढरे करण्यासाठी हा ऑनलाईनचा घाट घालण्यात आला आहे, अशा उव्दिग्न प्रतिक्रिया शिक्षकांकडून देण्यात येत आहेत. प्रशिक्षण मराठीतून असेल पण मराठीचा कोणताही भाग तेथे दिसत नाही.

नोकरीतील १२ वर्षाच्या सेवाकाळ पूर्ण केलेलेल्या शिक्षकाचे शैक्षणिक उन्नत्तीकरण, त्याची कुंठीतावस्था घालविणे, वेतनश्रेणी, पदोन्नत्तीसाठी हे प्रशिक्षण महत्वपूर्ण मानले जाते. त्यामुळे अनुदानित शाळांचे शिक्षक अधिक संख्येने या उपक्रमात सहभागी होतात. विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना सुविधा मिळत नसल्यातरी अनुभवाचा भाग म्हणून ते या उपक्रमात सहभागी होतात, असे शिक्षकांनी सांगितले. दोन वर्षात करोना महासाथ असल्याने हे प्रशिक्षण झाले नव्हते. यावेळी अधिक संख्येने शिक्षक या उपक्रमात सहभागी झाले आहेत.

इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड नावाचे प्रशिक्षण उपयोजन माध्यमातून हे प्रशिक्षण दिले जात आहे. या उपयोजनमध्ये ६० तासांचे प्रशिक्षण ध्वनीमुद्रित शैक्षणिक साहित्य आहे. त्यामधील पीडीएफ प्रकारातील साहित्य उघडून शिक्षकांनी त्याचा अभ्यास करायचा आहे. ध्वनीमुद्रित साहित्य ऐकायचे आहे. दररोज किमान दोन तास शिक्षकांनी या प्रशिक्षणात सहभागी व्हायचे आहे. महिनाभराच्या प्रशिक्षणानंतर शिक्षकांना ऑनलाईन पध्दतीने परीक्षा द्यायची आहे, असे शिक्षकांनी सांगितले.

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या तांत्रिक गोंधळाच्या असंख्य तक्रारी शिक्षकांनी राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर पाठविल्या आहेत. या तक्रारींची दखल घेण्यात आलेली नाही किंवा शिक्षकांना प्रतिसाद देण्यात आलेला नाही, असे शिक्षकांनी सांगितले. ऑनलाईन प्रशिक्षणाचा बोजवरा उडल्याची टीका शिक्षकांकडून केली जात आहे.

शिक्षकांच्या ऑनलाईन प्रशिक्षणात तांत्रिक समस्या उद्भवल्या आहेत. यासंदर्भात एक ऑनलाईन बैठक घेण्यात येणार आहे. तांत्रिक समस्या, त्यावरील उपाय यावर विचार करून प्रत्येक शिक्षकाला प्रशिक्षणाचा लाभ मिळेल यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. तांत्रिक समस्यांमुळे प्रशिक्षणार्थि शिक्षकांनी गोंधळून जाऊ नये.- ज्ञानेश्वर म्हात्रे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघ, अध्यक्ष, कोकण विभाग शिक्षक सेना

अनेक शिक्षक सुट्टीसाठी गावी गेले आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर मंडळाने पुन्हा अशाप्रकारचे प्रत्यक्ष उपस्थितीचे प्रशिक्षण शिक्षकांसाठी घ्यावे. प्रत्येक शिक्षकाला अशा प्रशिक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे अशी मागणी आपण मंडळाकडे केली आहे. – गुलाबराव पाटील
अध्यक्ष, माध्यमिक, उच्च माध्यमिक मुख्याध्यापक महासंघ, कल्याण-डोंबिवली