येथील किसननगर भागातील महापालिकेच्या ज्या शाळेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षण घेतले, त्याच शाळेत त्यांनी शुक्रवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमानिमित्ताने हजेरी लावली. या कार्यक्रमाच्यानिमत्ताने त्यांनी शाळेतील जुन्या आठवणी जाग्या उजाळा देत वर्गशिक्षक रघुनाथ परब यांची आठवण सांगितली. शाळेची आतासारखी इमारत नव्हती तर चाळीत ही शाळा भरायची. शाळेची स्वच्छता स्वत:च करायचो. त्यात वेगळा आनंद होता, असे सांगत मुख्यमंत्री शाळेच्या आठवणीत रमल्याचे दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>ठाण्यात ३ ते ६ फेब्रुवारीपर्यंत ‘क्रेडाई एमसीएचआय’च्या वतीने प्राॅपर्टी मेळाव्याचे आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परिक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण ठाणे महापालिकेच्या किसननगर येथील शाळा क्रमांक २३ मध्ये करण्यात आले होते. दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री शिंदे हे सहभागी झाले. याच शाळेतून मुख्यमंत्री शिंदे यांनी शिक्षण घेतले. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ते आपल्या शाळेत आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता. पंतप्रधानांच्या संवादानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आपल्या शाळेतील आठवणी जागवतानाच त्यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना परिक्षेला सामोरे जाताना ताण घेऊन नका असा सल्ला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थांना दिलेले संस्कार त्यांना नक्कीच उपयुक्त ठरतील. तणावमुक्त, खेळात रमणारा, वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होणारा विद्यार्थी घडावा. त्यांचे विचार ऐकणारे विद्यार्थी त्यातून नक्कीच प्रेरणा घेतील आणि परिक्षेदरम्यान येणारा तणाव दूर सारून आपल्या क्षमता हेरून आपले आयुष्य घडवतील अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. विद्यार्थ्यांमध्ये चिकाटी, आत्मबल, आत्मविश्वास असले पाहिजे. अपयशामुळे खचून जाऊ नका, यश हमखास मिळतेच असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी आयुष्यात आलेल्या अपयशानंतर खचलो नसल्याचे सांगितले. तसेच शिक्षण क्षेत्रात राज्य शासनाच्या माध्यमातून सुधारणा केल्या जात आहेत, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>काटई बदलापूर मार्गावरील जीवघेणे खड्डे बुजवा ,प्रवासी संतप्त; अचानक येणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांची कसरत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले एक्झाम वॉरियर्स हे पुस्तक ठाणे महापालिकेच्या तसेच राज्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane chief minister eknath shinde reminisced about the school amy
First published on: 27-01-2023 at 19:23 IST