ठाणे – जिल्ह्यातील सामाजिक संस्था, विविध प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आणि माजी सैनिक संघटना यांच्याकडे उपलब्ध असलेले मनुष्यबळ आणि इतर संसाधनांची सविस्तर माहिती तातडीने सादर करण्याचे आवाहन ठाणे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भारत – पाकिस्तान सशस्त्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून हे आवाहन करण्यात आले आहे. तर ही माहिती संबंधित तालुक्याचे तहसिलदार आणि महानगरपालिका क्षेत्रातील संस्थांनी महानगरपालिकेचे उपायुक्त (मुख्यालय) यांच्याकडे पुढील तीन दिवसांत द्यावी, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत – पाकिस्तान सीमेवर सशस्त्र संघर्ष सुरु झाला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरक्षा व्यवस्था देखील वाढविण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून हे महत्त्वपूर्ण आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आपत्कालीन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी आणि कोणत्याही आवश्यक परिस्थितीत तातडीने मदत पोहोचवण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे. सामाजिक संस्थांच्या स्वयंसेवकांचे मोठे नेटवर्क, प्रशिक्षण संस्थांकडील कुशल मनुष्यबळ आणि माजी सैनिकांचा अनुभव व शिस्त यांचा एकत्रितपणे उपयोग करून घेण्याच्या उद्देशाने प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. या आवाहनानुसार, जिल्ह्यातील प्रत्येक सामाजिक संस्थेने त्यांच्या संस्थेतील सक्रिय सदस्यांची संख्या, त्यांच्याकडे असलेल्या विशेष कौशल्यांची माहिती (उदा. प्रथमोपचार, शोध व बचाव कार्य, समुपदेशन इत्यादी), संस्थेकडील आवश्यक उपकरणे (वाहने, वैद्यकीय साहित्य, संपर्क यंत्रणा इत्यादी) आणि संस्थेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक सादर करणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे, विविध व्यावसायिक आणि कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थांनी त्यांच्याकडील प्रशिक्षित मनुष्यबळाची माहिती, जसे की कोणत्या क्षेत्रात किती प्रशिक्षित व्यक्ती उपलब्ध होऊ शकतील, त्यांची संपर्क माहिती आणि संस्थेकडे असलेल्या प्रशिक्षण सामग्रीची माहिती देणे आवश्यक आहे.माजी सैनिक संघटनेने त्यांच्या सदस्यांची संख्या, त्यांच्यातील विशेष कौशल्ये (उदा. आपत्कालीन परिस्थितीत काम करण्याचा अनुभव, नेतृत्व क्षमता), त्यांच्याकडे असलेली संसाधने आणि प्रमुख सदस्यांचे संपर्क क्रमांक तहसील कार्यालयात किंवा महानगरपालिका मुख्यालयात जमा करायचे आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या या आवाहनाला विहित वेळेत माहिती सादर केल्यास जिल्हा प्रशासनाला आपत्कालीन परिस्थितीत जलद आणि प्रभावी उपाययोजना करणे शक्य होईल. त्यामुळे, जिल्ह्यातील सामाजिक संस्था, प्रशिक्षण संस्था आणि माजी सैनिक संघटनांनी या महत्त्वपूर्ण आवाहनाची नोंद घ्यावी आणि तातडीने कार्यवाही करावी, असे ही जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने या संदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, “आपल्या जिल्ह्यात अनेक सामाजिक संस्था, प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आणि माजी सैनिक संघटना उत्कृष्ट काम करत आहेत. त्यांच्याकडे असलेले मनुष्यबळ आणि संसाधने यांचा उपयोग आपत्कालीन परिस्थितीत किंवा इतर कोणत्याही सामाजिक कार्यात प्रभावीपणे करता येऊ शकतो. यासाठी या सर्व संस्थांनी आणि संघटनांनी सहकार्य करावे आणि पुढील तीन दिवसांत आवश्यक माहिती सादर करावी.”