तिजोरीत केवळ ४० कोटी; ठेकेदारांची ८०० कोटींची देयके देण्याचा पेच ठाणे : करोना संकटाच्या काळात मालमत्ता कर आणि पाणी देयकांच्या वसुलीतून पालिकेला आर्थिक दिलासा मिळत असला तरी शहर विकास विभागासह इतर विभागांच्या उत्पन्नात अद्यापही अपेक्षित वाढ झालेली नाही. अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पगारवगळता महापालिकेला रस्ते साफसफाई, पाणी खरेदी तसेच इतर आवश्यक कामांसाठी महिन्याकाठी ३० कोटी रुपये खर्च करावे लागत असून सद्यस्थितीत पालिकेच्या तिजोरीत केवळ ४० कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे ठेकेदारांची थकलेली ८०० कोटी रुपयांची देयके द्यायची कशी, असा प्रश्न पालिकेपुढे उभा राहिल्याचे चित्र आहे. करोना संकटामुळे गेल्या दीड वर्षांपासून महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे. गेल्या वर्षी मालमत्ता कर आणि पाणी देयकांच्या वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यापर्यंत पालिकेला यश आले होते. पण इतर विभागांच्या कराची अपेक्षित वसुली झाली नसल्यामुळे पालिकेला मोठा आर्थिक फटका बसला होता. यामुळेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प १३०० कोटी रुपयांनी कमी करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पामध्ये विविध विभागांना दरवर्षीपेक्षा यंदा कमी उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे, तरीही मालमत्ता कर आणि पाणी देयकांची वसुली वगळता इतर विभागांना अद्यापही अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. राज्य शासनाकडून महापालिकेला दरमहा वस्तू आणि सेवा करातून ७६ कोटी रुपयांचे अनुदान मिळते. या अनुदानाच्या रकमेतून अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पगार दिले जातात. या पगारावर सुमारे ७५ कोटी रुपयांच्या आसपास पैसे खर्च होतात. त्यातच रस्ते साफसफाई, पाणी खरेदी तसेच इतर आवश्यक कामांसाठी महिन्याकाठी ३० कोटी रुपये खर्च करावे लागत असून सद्यस्थितीत पालिकेच्या तिजोरीत केवळ ४० कोटी रुपये शिल्लक आहेत. यामुळे पालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे चित्र आहे. अर्थसंकल्पाचे पुनर्नियोजन अशक्य यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये पूर्वी सुरू असलेली कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात आला होता. कोणतेही नवे, महत्त्वाकांक्षी आणि खर्चीक प्रकल्प हाती घेतले जाणार नसल्याचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी स्पष्ट केले होते. तसेच येत्या काळात महापालिकेचे उत्पन्न वाढताना दिसून आले तर, त्याप्रमाणे अर्थसंकल्पाचे पुनर्नियोजन करून त्यात नव्या प्रकल्पांचा समावेश करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले होते. परंतु करोना परिस्थिती निवळलेली नसल्यामुळे पालिकेला अद्यापही अपेक्षित उत्पन्न मिळताना दिसून येत नाही. त्यामुळे अर्थसंकल्पाचे पुनर्नियोजन होण्याची शक्यता धूसर असल्याचे चित्र आहे. पालिकेचा खर्च ठाणे महापालिकेला दरमहा कर्मचाऱ्यांचे पगारवगळता इतर बाबींसाठी ३० कोटी ७९ लाख २३ हजार १२६ रुपये खर्च करावे लागतात. त्यामध्ये पाणी खरेदीसाठी १० कोटी ७६ लाख, घंटागाडी योजना २ कोटी ७९ कोटी, रस्ते साफसफाई ५ कोटी ४ लाख, सुरक्षारक्षक १ कोटी ३५ लाख, शिक्षण विभागाचे सुरक्षारक्षक ७२ लाख १३ हजार, इंधन खर्च ४२ लाख, विजेचा खर्च ५ कोटी ४६ लाख, स्मशानभूमी मनुष्यबळ ५ कोटी ८० लाख, कळवा रुग्णालय साफसफाई ५५ लाख, कर्ज परतफेड २ कोटी ९६ लाख, आरसीएच वेतन खर्च १३ लाख १२ हजारांचा समावेश आहे.