ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने राज्यात आणि परराज्यात ज्वेलर्स आणि फायनान्स कंपन्यांवर दरोडा टाकणाऱ्या टोळीला गजाआड केले. मिळालेल्या माहितीच्या आधारावर ठाणे पोलिसांच्या पथकांनी विविध जिल्ह्यामधून तब्बल १५ सराईत घरफोडी करणाऱ्यांना आरोपींना अटक केली. यामध्ये झारखंड, नेपाळ आणि उत्तराखंड येथील आरोपींचा समावेश आहे. ठाण्याच्या नौपाडा परिसरातील येथील मुथूट फायनान्स या कंपनीवर ही टोळी दरोडा टाकणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी विविध पथके तयार केली आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे कारवाई केली. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी ठाण्यातील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये वास्तव्याला होते. पोलिसांच्या पहिल्या पथकाने हॉटेल रॉयल हेरीटेज येथून आरोपी अब्दुल मजीद हसन शेख(३४), उमर रज्जाक खातीब शेख(२५), असुद्दिन कुर्शोड शेख(२९) या तिघांना अटक केली. हे सर्व आरोपी झारखंड येथील राहणारे आहेत. तर दुसऱ्या पोलीस पथकाने घोडबंदरच्या द्वारका हॉटेलमधून महमद जमील अख्तर अली (३७), बरकत अबुल शेख(२९) सेनाउल कुलास शेख(३१) त्रिकुटाला अटक केली. तर तीनहातनाका येथील पोलिसांच्या पथकाने राजकुमार उर्फ भोला उर्फ मिस्त्री बाबूलाल शर्मा(४४) रा. वाशी नवी मुंबई, तापल उर्फ तप्पू भगवान मंडल (४०) यांना सापळा रचून ताब्यात घेतले तर वसंत विहार चौक ठाणे येथून आरोपी दिनेश प्रभू गुप्त(२९) रा. वाघबीळ,ठाणे, ओमप्रकाश भददु मंडळ (३९) रा. झारखंड बाबू बादशाह मुजावर (३२) अ. धर्मवीर ठाणे, राजू केदार यादव (४०) रा. मिरारोड व उत्तरप्रदेश आणि दशरथ गंगाराम बहादूरसिंग (१८) रा. मिरारोड यांना अटक करण्यात आली. पोलीस पथकांनी ताब्यात घेतलेल्या १५ आरोपींकडून पोलिसांनी चॉपर, तलवार, गेस पाईप, पक्कड, पाना, गेस कटिंग नोझल, मिरची पूड, दोरी, ऑक्सिजन गॅस सिलेंडर, डोमेस्टिक गॅस सिलेंडर्स, १६ मोबाईल फोन,सॅन्ट्रो कार असा १ लाख ८५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलीस तपासात आरोपींनी नौपाड्यातील मुथूट फायनान्स कंपनीवर दरोडा टाकण्याचा कट रचल्याची कबुली दिली. यापूर्वी या टोळीने राज्यात आणि परराज्यात अनेक ठिकाणी ज्वेलर्सच्या आणि फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर दरोडे घातले आहेत. या आरोपींनी झहीराबाद येथील मुथूट फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर दरोडा टाकून तब्बल ७७ किलो सोने लांबविले होते. तर उल्हासनगरच्या मणिपुरम येथे दरोडा टाकून २८ किलो सोने लांबविले होते. या आरोपींनी उतराखंड, गुजरात, आदि राज्यात दरोडे टाकून कोट्यावधीची लुट केलेली आहे. या टोळीत तब्बल ५० पेक्षा अधिक सराईत गुन्हेगार असावेत, असा अंदाज पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी व्यक्त केला. या टोळीतील सदस्य आपण आंब्याचे व्यापारी असल्याची बतावणी करत. आंब्याचा व्यवसाय करण्यासाठी ते भाड्याने ज्वेलर्स किंवा फायनान्स कंपनीच्या बाजूलाच दुकान भाड्याने घेत असत. मग भिंती तोडून दुकानात प्रवेश करून लुट करत करायची, अशी टोळीची कार्यपद्धती होती. या आरोपींना २८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.