ठाणे : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो नोकरदारांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे ठाणे-सावंतवाडी विशेष ‘धर्मवीर आनंद दिघे एक्सप्रेस’ सुरू करण्याची मागणी केली आहे. यासोबतच अतिरिक्त आरक्षण खिडक्या, सावंतवाडी टर्मिनसचे रखडलेले काम आणि अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना सावंतवाडी येथे थांबा देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो नोकरदारांच्या रेल्वे प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे प्रशासनाकडे विविध महत्त्वपूर्ण मागण्या लावून धरल्या आहेत. याबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी मुबंई मध्य रेल प्रबंधक, मुंबई महाप्रबंधक आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदने दिली आहेत. गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा महासण मानला जातो. दरवर्षी मुंबई, ठाणे आणि मुंबई महानगर प्रदेशातील लाखो कोकणी नोकरदर आपल्या मूळ गावी कोकणात जात असतात.

यंदा गणेशोत्सव १४ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होत असून, त्यासाठीचे ६० दिवस आधीचे आगाऊ रेल्वे आरक्षण ११ जुलै ते ३० जुलै २०२६ या कालावधीत होणार आहे. या काळात रेल्वे आरक्षण केंद्रांवर प्रचंड गर्दी होत असल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन ठाणे रेल्वे आरक्षण केंद्रात सध्या सुरू असलेल्या खिडक्यांव्यतिरिक्त किमान दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी खासदार म्हस्के यांनी केली आहे.

अशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी

आरक्षण प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुलभ व्हावी यासाठी अनुभवी, गतिमान आणि प्रवाशांशी संवेदनशीलतेने वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, तसेच तिकीट दलाल आणि गैरप्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल आणि स्थानिक पोलिसांची विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याची मागणी म्हस्के यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

‘धर्मवीर आनंद दिघे एक्सप्रेस’ सुरू करा

गणेशोत्सव काळात नियमित गाड्यांवरील प्रचंड ताण लक्षात घेता ठाणे ते सावंतवाडी दरम्यान विशेष ‘धर्मवीर आनंद दिघे एक्सप्रेस’ सुरू करण्याची आग्रही मागणीही खासदार म्हस्के यांनी केली आहे. ठाणे शहराचे प्रेरणास्थान आणि ज्येष्ठ समाजसेवक आनंद दिघे यांच्या लोकसेवेचा गौरव म्हणून या विशेष गाडीला ‘धर्मवीर आनंद दिघे एक्सप्रेस’ असे नाव देण्यात यावे, अशी भावनिक मागणीही त्यांनी केली आहे. मुंबई, ठाणे आणि एमएमआरमधील लाखो कोकणवासी दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जात असतात.

मात्र अपुऱ्या गाड्या, वाढती प्रतीक्षा यादी आणि पर्यटकांची गर्दी यामुळे सामान्य प्रवाशांना आरक्षण मिळवणे कठीण होते. या पार्श्वभूमीवर कोकणासाठी स्वतंत्र विशेष ट्रेन सुरू करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.‘कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी (मुंबई विभाग)’ यांनी सादर केलेल्या निवेदनाचा संदर्भ देत त्यांनी ही मागणी मध्य रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

अतिरिक्त फलाटची मागणी

कोकणातील रेल्वे पायाभूत सुविधांबाबतही खासदार म्हस्के यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा पहिला टप्पा पूर्ण झाला असला तरी दुसरा टप्पा अद्याप रखडलेला आहे. या टप्प्यात प्रशासकीय इमारत आणि गाड्यांमध्ये पाणी भरण्याच्या अत्यावश्यक सुविधा प्रस्तावित आहेत. स्वतंत्र रेल्वे संचालनासाठी हा टप्पा महत्त्वाचा असल्याने त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. भविष्यातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त फलाट आणि रेल्वे गाड्या उभ्या ठेवण्यासाठी स्वतंत्र मार्गिका उभारण्याचा आग्रह त्यांनी धरला आहे.

‘अमृत भारत स्टेशन योजना’त स्थान द्यासावंतवाडी टर्मिनस प्रकल्पाचा ‘पीएम गति शक्ती नॅशनल मास्टर प्लॅन’मध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी करतानाच सावंतवाडी रेल्वे स्थानकाला ‘अमृत भारत स्टेशन योजना’त स्थान देण्याची मागणी त्यांची आहे. देशभरातील अनेक स्थानकांचा या योजनेतून कायापालट होत असताना सावंतवाडीसारखे महत्त्वाचे पर्यटन आणि सांस्कृतिक केंद्र या योजनेपासून वंचित राहणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुंबईहून सुटणाऱ्या बहुतांश गाड्या गोवा किंवा दक्षिण भारतापर्यंत जात असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होते.

त्यामुळे खेड, चिपळूण, रत्नागिरी आणि सावंतवाडीसारख्या कोकणातील स्थानकांसाठी सामान्य प्रवाशांना आरक्षण मिळणे अवघड होते. ही समस्या दूर करण्यासाठी मुंबई, दादर, ठाणे ते सावंतवाडी दरम्यान ‘वंदे भारत’ दर्जाची स्वतंत्र ‘धर्मवीर एक्सप्रेस’ सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ही गाडी सावंतवाडीपर्यंतच मर्यादित ठेवल्यास तिचे संपूर्ण आरक्षण कोकणातील स्थानिक प्रवासी आणि चाकरमान्यांसाठी उपलब्ध राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राजधानी-वंदे भारतचा थांबा द्यासावंतवाडी रेल्वे स्थानकाला लांब पल्ल्याच्या गाड्यांचे थांबे देण्याबाबतही खासदार म्हस्के यांनी रेल्वे प्रशासनासमोर ठोस आकडेवारी मांडली आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार सावंतवाडी स्थानकातून दररोज सुमारे ४ लाख ८८ हजार ९२० इतके तिकीट उत्पन्न मिळते. त्यातील तब्बल ९५ टक्के उत्पन्न ५०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या प्रवासातून मिळत असल्याने या स्थानकाचे व्यावसायिक महत्त्व अधोरेखित होते, असे त्यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर राजधानी एक्सप्रेस, गरीब रथ एक्सप्रेसचे कोविड काळात बंद झालेले थांबे पुन्हा सुरू करावेत, सीएसएमटी-मंगळुरू एक्सप्रेस, मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस, गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस, एर्नाकुलम-निजामुद्दीन एक्सप्रेस आणि तिरुवनंतपुरम-निजामुद्दीन एक्सप्रेस या गाड्यांना सावंतवाडी येथे थांबा मंजूर करावा, अशी मागणीही खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे.