ठाणे : ‘ऑपरेशन सिंदूर’ वर आता शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनीही प्रतिक्रिया दिली. धर्म देख कर मारा था, धर्म बता कर मारा है, असे म्हणत त्यांनी भारतीय लष्कराच मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. यात २६ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर देशभरातून संतप्त भावना व्यक्त केल्या जात होत्या. गेल्या १५ दिवसांत या मुद्द्यावरून देशभरातील वातावरण तापले होते. दहशवाद्याना जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. मोदी यांनी काही कठोर निर्णय घेऊन पाकिस्तानची पाणी कोंडी केली होती. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्ध होईल, अशी चिन्ह दिसू लागली होती. असे असतानाच, मंगळवारी मध्यरात्रीनंतर अर्थात ७ मे रोजी पहाटे भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या परिसरातील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकला भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव दिले.
‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर सर्वच सस्तरातून भारतीय लष्करावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे. अशाच प्रकारे शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनीही समाज माध्यमांद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. “ऑपरेशन सिंदूर खूप खूप स्वागत ! पाकड्यांचे 9 दहशदवादी तळं उध्वस्त केल्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा..सर्व भारतीय जवानांना मनापासून सलाम ! धर्म देख कर मारा था, धर्म बता कर मारा है, भारतीय लष्कराच मनःपूर्वक अभिनंदन. जय हिंद अशी प्रतिक्रिया केदार यांनी दिली आहे.