ठाणे जिल्ह्यातील सर्वचजण एकनाथ शिंदे यांना समर्थन देत आहेत. त्यामुळे पक्षाचे नेते अजून किती पदाधिकाऱ्यांना पक्षातून काढणार आहेत, असा प्रश्न उपस्थित करत पक्षातून काढण्याचे सत्र असेच सुरु राहिले तर शिवसेना शाखांना टाळे लावायला माणूस शिल्लक राहणार नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे समर्थक तसेच माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी दिली आहे. पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनीच पक्ष संपवायला घेतला असून आमची पदे काढून घेतली असली, तरी आमचे शिवसैनिक पद कुणीच काढून घेऊ शकत नाही, असेही त्यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून एकनाथ शिंदे ओळखले जातात. जिल्ह्यात त्यांचा मोठा दबदबा आहे. त्यामुळेच त्यांच्या बंडानंतर जिल्ह्यात शिवसेनेत फुट पडण्याची शक्यता वर्तविली जात होती. नरेश म्हस्के यांच्याबरोबरच मिनाक्षी शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांचे उघडपणे समर्थन करत जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. पक्ष विरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेनेने त्या दोघांची पक्षातून हकालपट्टी केली. यानंतर मिनाक्षी शिंदे यांनी टेंभीनाक्यावर शक्तीप्रदर्शन करत शिंदे समर्थक असल्याचे स्पष्ट केले. यामुळे शिवसेनेत मोठी फुट पडल्याचे चित्र आहे. पक्षाचे नेते अजून किती पदाधिकाऱ्यांना पक्षातून काढणार आहेत?- मिनाक्षी शिंदे या ठाण्याच्या माजी महापौर असून त्या आक्रमकपणे भुमिका मांडणाऱ्या नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यात मोठे काम केले असून त्यांनी जिल्ह्यात पक्ष वाढवला आहे. यातूनच जिल्ह्यातील सर्वजजण त्यांना समर्थन देत आहेत. अशा पदाधिकाऱ्यांना पक्षातून काढले जात आहे. त्यामुळे पक्षाचे नेते अजून किती पदाधिकाऱ्यांना पक्षातून काढणार आहेत, असा प्रश्न उपस्थित मिनाक्षी शिंदे यांनी उपस्थित केला आहे. तसेच पक्षातून काढण्याचे सत्र असेच सुरु राहीले तर शिवसेना शाखांना टाळे लावायला माणूस शिल्लक राहणार नाही, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.