कल्याण भिवंडी बायपास रोडवर ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आज ठाण्यामध्ये पहायला मिळत आहे. ट्रकच्या या रांगात सात ते आठ किलोमीटर लांबपर्यंत असून अनेक तास ट्रक एकाच जागी उभे असल्याचं पहायला मिळतंय. सोनाळे ते वडपेदरम्यान मोठ्याप्रमाणात ट्रक्सची वाहतूक कोंडी झालीय. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावरील रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक विरुद्ध दिशेने सुरू आहे. त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाल्याचं दिसून येत आहे. एकाच मार्गिकेवरुन वाहतूक होत असल्याने वाहतूक कोंडी येणाऱ्या आणि जाणाऱ्या अशा दोन्ही मार्गांवर आहे. या मार्गावर अशाप्रकारे वाहतूक कोंडी ही सामान्य बाब असली तरी आज झालेली वाहतूक कोंडी ही तुलनेने फारच गंभीर आणि ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्याने चर्चेचा विषय ठरतेय. अवजड वहाने, मालवाहू ट्रकमुळे अनेक ठिकाणी लहान गाड्याही अडकून पडल्याचं चित्र दिसत आहे. नाशिककडे जाणारी आणि येणारी अवजड वहाने याच मार्गावरुन ये-जा करतात. त्यामुळे कल्याण- भिवंडी बायपास हा नाशिकला मुंबई आणि उपनगरांशी जोडणाऱ्या मुख्य मालवाहू रस्त्यांपैकी एक आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहनतळांचा प्रयोगठाणे शहरामध्ये विविध कारणांनी निर्माण होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी जिल्ह्यात चार ठिकाणी अवजड वाहनांकरिता वाहनतळांची निर्मिती करण्याचा निर्णय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यापूर्वी घेतला होता. या निर्णयानुसार नवी मुंबई, खारेगाव, शहापूर, दापचारी येथून वाहनतळांच्या माध्यमातून वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रस्ताव आहे. यावर काही प्रमाणात काम सुरु झालं आहे. याचा साकारात्मक परिणामही मागील काही महिन्यांपासून दिसून येतोय. या चार ठिकाणांहून कोंडी सोडवण्याचा प्रयत्नजेएनपीटीतून निघणारी वाहने जेएनपीटीच्या शेजारील वाहनतळामध्ये थांबवण्यात येणार आहेत. नाशिकवरून मुंबईकडे येणारी वाहने मुंबई-नाशिक महामार्गावर खर्डी-सोनाळे-दापोडे येथे थांबवण्यासाठी, अहमदाबाद येथून येणारी वाहने दापचारी येथे थांबवण्यासाठी, ठाणे शहरात येणाऱ्या वाहनांचे नियोजन करण्यासाठी खारेगाव टोलनाक्याच्या दोन्ही बाजूस वाहनतळ तयार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलेलं. या ठिकाणी अवजड वाहने रोखून टप्प्याटप्प्याने शहरात सोडण्यास प्रायोगिक तत्वावर सुरुवातही झालीय.