ठाण्यातील वर्तक नगर येथील उपवन भागात दुर्दैवी घटना घडली आहे. दुपारी चारच्या सुमारास एका डबक्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले असून ते रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. गौतम वाल्मिकी (१२), निर्भय वाल्मिकी (१५) अशी मुलांची नावे आहेत. दोघेही चुलत भाऊ असून गौतम हा ठाण्यातील शास्त्रीनगर भागात राहतो. तर निर्भय हा उत्तरप्रदेश येथून दोनच दिवसांपूर्वी गौतमच्या घरी राहण्यास आला होता. ठाणे पश्चिमेकडील उपवन परिसरातील रामबागजवळील एका मोठ्या डबक्यात गौतम आणि निर्भय पोहण्यासाठी उतरले होते.मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर टीडीआरएफ पथक, वर्तक नगर पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि अग्निशमन कर्मचारी आपत्कालीन वाहन आणि रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचले. या डबक्यात मुलांचा शोध घेण्यात आला. शोधमोहीमेदरम्यान आधी एकाचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर दुसरा मृतदेह हाती लागला. त्यानंतर मृतदेह वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. गौतम शास्त्रीनगर येथील रहिवासी होता.