ठाणे : भारत सरकारच्या राष्ट्रीय पशुधन योजना अंतर्गत ठाणे जिल्हा परिषद आणि पशुसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यातील पशुपालकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. योजनेचा मुख्य उद्देश पशुपालकांना व्यवसायिक दृष्टिकोनातून सक्षम बनविणे हा असून, कुक्कुटपालन, शेळीपालन, डुक्करपालन आणि दुभती जनावरे या घटकांसाठी आर्थिक अनुदान व सवलती प्रदान केल्या जाणार आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे स्वतःची जमीन किंवा आवश्यक सुविधा असणे आवश्यक आहे.
ठाणे जिल्ह्यात 2024-25 या आर्थिक वर्षात अनेक लाभार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले असून, अधिकाधिक पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. समीर तोडणकर यांनी केले आहे.
– योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
या योजनेच्या अर्जासोबत आधारकार्ड, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला आणि प्रकल्प अहवाल ही कागदपत्रे समाविष्ट करणे अनिवार्य आहे.
– योजनेच्या प्रचारासाठी जनजागृती
योजनेच्या व्यापक प्रचारासाठी गावपातळीवर जनजागृती मोहीम, पोस्टर, बॅनर तसेच कृषी व पशुपालक मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. याशिवाय ग्रामसेवक, पशुधन पर्यवेक्षक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून मार्गदर्शन दिले जात आहे.
लाभार्थ्यांच्या निवडीत अल्पभूधारक, महिला, अनुसूचित जाती-जमाती व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना प्राधान्य दिले जाणार असून, ही प्रक्रिया ऑनलाईन आणि पारदर्शक असणार आहे.
– योजनेसाठी अर्ज कसा करावा या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन असून, लाभार्थ्यांनी https://ah.mahabms.com या अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज सादर करायचा आहे. किंवा गूगल प्ले स्टोर वर उपलब्ध असलेल्या AH-MAHABMS या ॲप वर सुद्धा अर्ज भारता येणार आहे.