ठाण्याच्या राबोडी या मुस्लिम बहुल विभागात राष्ट्रवादीच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “तिरंगा रॅली” काढण्यात आली. या रॅलीमध्ये सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या घोषणा देण्यात आल्या.

काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये ७५ फूट लांबीचा तिरंगा घेऊन शेकडो विद्यार्थी, हिंदू, मुस्लिम नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेक विद्यार्थी सैनिक, राष्ट्रपुरुषांची वेशभूषा करून या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. मुस्लिम बहुल भागातील ही पहिलीच तिरंगा रॅली असूनही नागरिकांनी आपला प्रचंड सहभाग नोंदविला.

सामाजिक समतेचा संदेश देण्यासाठी ही रॅली आयोजित केली होती. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना लहान मुले आणि तरूणांना स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास ज्ञात व्हावा, या उद्देशाने ही रॅली आयोजित केली होती. ही रॅली यशस्वी करण्यासाठी राबोडी फ्रेंड सर्कल, आयडीयल स्कूल, ठामपा शाळा, फातिमा हायस्कूल या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी यांचा सिंहाचा वाटा होता, असे मुल्ला यांनी सांगितले.