ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या महिनाभरात करोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याचे चित्र असतानाच, शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढण्यास सुरूवात केल्याचे समोर येत आहे. गेल्या महिनाभरात शहरामध्ये मलेरियाचे २२ तर डेंग्युचा एक रुग्ण आढळून आला आहे. यामुळे सर्तक झालेल्या महापालिका प्रशासनाने आता शहरात व्यापक प्रमाणात धूर आणि औषध फवारणी सुरु केली आहे. त्याचबरोबर पाण्यामुळे साथीचे आजार पसरू नये यासाठी प्रत्यक्ष घरी जाऊन पाण्याची तपासणी करण्यासही सुरुवात केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये फेब्रुवारी महिन्यात डेंग्युचा एक रुग्ण आढळला होता तर, एक संशयित रुग्ण आढळला होता. याच महिन्यात मलेरियाचे एकूण २२ रुग्ण आढळले आहेत. तर, चिकनगुनियाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. परंतु डेंग्यु आणि मलेरियाचे रुग्ण आढळल्याने शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याचे स्पष्ट होत असून रुग्णांचा आकडा अधिक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे साथीच्या आजारांना रोखण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी पावलं उचलण्यास सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी शहरात धूर आणि औषध फवारणी करण्याबरोबरच घरोघरी जाऊन पाण्याची तपासणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले होते. त्यानुसार या विभागाने घरोघरी जाऊन पाण्याची तपासणी सुरु केली आहे. यामध्ये ४२ हजार ११७ घरांमध्ये जाऊन पथकाने पाण्याची तपासणी केली. त्यापैकी १ हजार ८२ घरात दुषित पाणी आढळुन आले. या घरांमधील एकुण ५९ हजार २५१ पिंपात साठविलेल्या पाण्याची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १ हजार ३६७ पिंपातील पाणी दूषित असल्याचे आढळुन आले आहे. यापैकी ४०२ पिंपात अळीनाशक औषध टाकण्यात आले. तर ८२६ पिंप रिकामे करण्यात आले. तसेच महापालिका क्षेत्रात ९० हॅण्डपंप, १० ट्रॅक्टर्स, ७ ई-रिक्षा, ८ बोलेरो वाहनामार्फत दोन सत्रात १ हजार ६२७ ठिकाणी औषध फवारणी आणि ४० धूर फवारणी यंत्राव्दारे १५ हजार ५७२ ठिकाणी धूर फवारणी करण्यात आली आहे.