बदलापूरः केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितींत सज्जता तपासण्यासाठी ऑपरेशन अभ्यास अंतर्गत शुक्रवारी बदलापुरात मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे. बदलापूर पूर्वेतील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, सुरवळ चौक येथे दुपारी चार वाजता हे मॉक ड्रील होईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. यात शहरात सायरन वाजवले जाणार असून युद्धजन्य स्थितीत प्रशासनाला कसा प्रतिसाद द्यायचा याचे प्रात्याक्षिक दाखवले जाणार आहे.

ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिनगारे, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उल्हासनगर प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार अमित पुरी यांच्या पुढाकारातून हे मॉक ड्रील आयोजित करण्यात आले आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी भारताने उघडलेल्या पाकिस्ताविरोधी आघाडीसाठी नागरिकांच्या सज्जतेसाठीही तयारी सुरू आहे. त्याचा भाग म्हणून राज्यात दोन दिवसांपूर्वी मॉक ड्रील करण्यात आले. सर्वच प्रशासकीय यंत्रणा, संरक्षण दल यांचाही यात समावेश आहे. ठाणे जिल्ह्यात कल्याण येथे पहिल्या टप्प्यात मॉक ड्रील संपन्न झाले. त्यात सर्वच प्रशासकीय यंत्रणांचा सहभाग होता. त्यानंतर आता बदलापुरात या मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले आहे.

नेमके काय होणार

या मॉक ड्रीलमध्ये बदलापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील सायरन वाजणार आहेत. युद्धजन्य स्थितीत हवाई हल्ला किंवा बॉम्ब हल्ल्याची सूचना कशा पद्धतीने दिली जाईल याचे हे प्रात्याक्षिक असेल. या सायरनच्या वाजण्यानंतर सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठीच्या सूचना दिल्या जातील. अशा स्थितीत कोणतीही धावाधाव, गडबड न करता नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविले जाईल. ज्या ठिकाणी हा युद्धाभ्यास आहे त्या ठिकाणी आणि संबंधित परिसरात शोध मोहीम घेवून जखमी, अडकलेल्या नागरिकांची तात्काळ सुटका करणे याचेही प्रात्याक्षिक दाखवले जाईल. तसेच त्यांना प्रथमोपचार करणे, त्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

यानुषंगाने सर्व यंत्रणांनी या मॉक ड्रिलला गांभीर्याने घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. केंद्रीय गृह विभागाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून यशस्वीरित्या ही मॉक ड्रिल पार पाडावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. मॉक ड्रिलच्या दरम्यान सूचना मिळाल्यानंतर दुपारी ४ वाजता सायरन वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा दिला जाईल. या दरम्यान नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, सेल्फी काढू नये आणि प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. हे मॉक ड्रिल केवळ पूर्वतयारीचा भाग असून कोणतीही खरी आपत्ती उद्भवलेली नाही, हे लक्षात घ्यावे, असे आवाहन तहसिलदार अमित पुरी यांनी केले आहे.