तत्कालीन काळातील वर्तमानाचे जे काही प्रकार समाजाने जतन करून ठेवलेले आहेत, त्यांच्यात सातत्य ठेवणे म्हणजेच परंपरा होय. परंपरा या परिवर्तनशील असतात. प्रत्येक जन्माला आलेली व्यक्ती त्याचे जीवन सुरक्षितपणे सुरू ठेवण्यासाठी व्यवसाय करत असते. कलांतराने व्यवसायातही बदल होत जातात. शेती हा भारतातील मूलभूत व्यवसाय आहे. पण ती शेती त्या-त्या प्रदेशाच्या हवामानाप्रमाणे होते. उत्तर कोकणातील वसई भागात पाऊस मोठय़ा प्रमाणात पडतो. त्यामुळे येथे भात शेती प्रामुख्याने केली जाते. वसईमध्ये, भाताचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. अल्पावधीत दोन महिन्यात, अडीच महिन्यात, तीन महिन्यात येणारा भात इत्यादी. हिवाळ्यात वाल आणि हरभरे हे मोठय़ा प्रमाणात घेतले जात असत. कापणी झाल्यावर ही कडधान्ये लावण्यात येतात तसेच त्यांना कमी पाणी लागते. ओढय़ाच्या बाजूला मका लावण्यात येतो किंवा पावसाळ्यानंतरही पाऊस पडला तर मका, ज्वारी, बाजरी तसेच पाणी देण्याची सोय असल्यास या पिकांसह उसही लावण्यात येतो. पटणी, सुरती कोलम, डांगावेल, हलका कोलम इत्यादी जातीचे तांदूळ, जमिनीच्या गुणधर्मानुसार येथे पिकवले जातात. दोन-अडीच महिन्यात हरभऱ्याचे चणे तयार होतात. तयार चणे सुकवून फुटतात आणि त्या बेगमीस डब्यात भरून ठेवतात. दोन वेळा नांगरलेल्या जमिनीत वाल पेरले जातात किंवा काही ठिकाणी लोखंडी खिळ्याने खोचरे मारले जातात. उत्तर कोकणातील १०० वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या लोकगीतांतून आपल्याला असे समजते की, पूर्वी या भागात जायफळाची शेती केली जात असे. कुळंब्याशा पुता झुपिलॉ नांगर। वाईलॉ आगर जायफळासॉ। (सामवेदी भाषेतील गीत) अर्थात, शेतकऱ्याच्या पुत्रा तू नांगर जोडलास आणि जायफळाचे शेत (बाग) नांगरून काढलेस. पूर्वी जायफळानंतर, येथे उसाची शेती मोठय़ा प्रमाणात असल्याचे दिसते. तसेच येथे उसाचे अनेक कारखानेही होते. ब्रिटिश काळात वसई किल्ल्यात उसाचा कारखाना चालत असे. अनेक लोक गुळाचा व्यापार करत होते. मराठय़ांची सत्ता गेल्यानंतर, ब्रिटिशांकडे सूत्रे आली. त्यांनी येथील जमीन भाडेतत्त्वावर देण्यास सुरुवात केली. परंतु आता येथे कोणीही उसाची शेती करताना दिसत नाही. केळे या शब्दाचे उगमस्थान कर्दली या संस्कृत शब्दामध्ये असल्याचे दिसते. प्राचीन काळापासून भारतात केळी पिकतात. वसईमध्ये देखील केळी मोठय़ा प्रमाणात पिकतात. केळीच्या लागवडीबाबत असे सांगितले जाते की, बसरा बंदरातून बसराई तसेच बंगाली जातीची केळी येथे व्यापाऱ्यांनी आणली. सुरुवातीला किनारपट्टीवर केली जाणारी लागवड पुढे सर्व गावा-गावांत दिसू लागली. तसेच, सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी या फळाला बनाना हे नाव दिले, मग ते इंग्रजीतही रुळले असेही सांगतात. येथे, बंगाली, सफेद वेलची, आंबट वेलची, मुठेळी, राजेळी, भुरकेळी, बनकेळी, हजारी, तांबडी केळी इत्यादी अनेक जातींची केळी वसईत पिकतात. अवीट गोडीची सुकेळी हे वसईचे केळ्यांचे आणखी एक वैशिष्टय़ होय. सुकेळी बनवण्यासाठी राजेळी जातीची केळी नैसर्गिकपणे पिकल्यानंतर, ती उन्हात सुकवली जातात. नंतर केळी सामान्य वातावरणात ठेवली जातात, त्याचा संपूर्ण चीक निघाल्यावर मातीच्या मोठय़ा रांजणात (पराडय़ात) केळी ठेवण्यात येतात मग त्यावर दुसरे रांजण ठेवले जाते. तीन-चार दिवसानंतर ती बाहेर काढून, केळ्यांची साल काढतात. मग ही केळी बांबूच्या मांडवावर उन्हात सुकवतात. आठवडाभर उन्हात सुकवल्यावर, सुकलेल्या केळीच्या पानात गुंडाळतात. मग ही केळी राज्यभरात तसेच परदेशातही पाठवली जातात. आता सुकेळी बनवण्याचे प्रमाण अतिशय कमी झालेले आहे. परंतु काही गावांतील जत्रांमध्ये आजही या सुकेळीचा स्वाद घेता येतो. दिशा खातू @Dishakhatu disha.dk4@gmail.com