वाहनांचा भार वाढल्याने परिणाम ठाणे : करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने शहरात वाहनांचा भार वाढू लागला आहे. त्याचा परिणाम शहरातील वाहतुकीवर होऊ लागला आहे. गेल्या तीन दिवसांपासून दररोज सकाळी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर कोपरी रेल्वे पूल ते तीन हात नाका उड्डाणपुलापर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. पाच मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी २० ते २५ मिनिटे लागत आहेत. पूर्व द्रुतगती मार्गावरील अंत्यत अरुंद असलेल्या कोपरी पुलावरच्या रुंदीकरणाचे काम २०१८ पासून मध्य रेल्वे आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सुरू आहे. सुरुवातीला अतिरिक्त नव्या मार्गिका तयार करणे आणि त्यानंतर मुख्य मार्गिका तयार करणे असे या कामाचे स्वरूप होते. त्यानुसार नव्या मार्गिका तयार झाल्या असून सध्या मुख्य मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. तर नव्या मार्गिकांवरून दररोजची वाहतूक सोडण्यात येत आहे. करोनाचा प्रादुर्भाव आता ओसरू लागल्यानंतर खासगी कंपन्यांत काम करणारे कामगार पुन्हा एकदा कामावर रुजू होऊ लागले आहेत. अनेक कामगार खासगी वाहनांनी मुंबई गाठू लागले आहेत. त्यामुळे वाहनांचा भार अचानक वाढल्याने गेल्या तीन दिवसांपासून सकाळी ८.१५ ते ९ दरम्यान मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. अवघे ५ मिनिटांचे अंतर पार करण्यास चालकांना २० ते २५ मिनिटे लागत आहेत. रात्री ८ नंतरही मुंबईहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनाही आनंदनगर जकातनाका येथील वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे. होते काय ? पुलाच्या मुख्य मार्गिका खुल्या होत्या. तेव्हा वाहन चालकांना नव्या आणि मुख्य मार्गिकांचा पर्याय उपलब्ध होता. आता मुख्य मार्गिका बंद झाल्या आहेत. नव्या मार्गिकांवरून वाहतूक सुरू असते. परंतु या दोन्ही मार्गिका केवळ दोन-दोन पदरी आहेत. पूर्व द्रुतगती मार्ग हा सहा पदरी आहे. कोपरी पुलावर वाहने येताच दोनपदरी मार्गिका अरुंद पडत असून वाहनांच्या रांगा लागत आहेत.