ठाणे: नाशिक-मुंबई महामार्गावरील साकेत पुला जवळ गुरुवारी सकाळी ५:३० वाजताच्या सुमारास कोंबड्यांची वाहतूक करणार्या ट्रक चा अपघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या अपघातात ट्रक मधील तीन जणांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतू, या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ संथ गतीने सुरू होती.

अब्दुल बारीक (४०), फैजुल अली (३०) आणि राजेश गौड (२७) हे तिघे ठाण्यातील वसंत विहार येथील रहिवासी आहेत. हे तिघे आळेफाटा पानेर रोड येथून नाशिक मुंबई महामार्गाने वसंत विहारच्या दिशेने सुमारे १६०० कोंबड्यांची वाहतूक करत होते. अब्दुल बारीक हा वाहन चालवत होता. साकेत पुलाजवळ येताच त्याचे

वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी उभ्या असलेल्या पोकलेन मशीनवर आदळला. या अपघाताची माहिती मिळताच, कापूरबावडी पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचाव कार्य करताना अपघातग्रस्तांना वाहनातून बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातानंतर काही वेळ वाहतूक संथ गतीने सुरू होती. मात्र, अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.