नालासोपारा येथे झायलो गाडीने अॅक्टिव्हा गाडीला दिलेल्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झाला. अनिकेत शिंदे (२०) आणि प्रणीत गिरकर (१९) अशी अपघातात मरण पावलेल्या तरुणांची नावे आहेत. टाकी रोडवरील दत्तकृपा सोसायटीत राहणारा अनिकेत शिंदे (२०) हा आपले दोन मित्र प्रणीत आणि आकाश यांना घेऊन निर्मळच्या जत्रेत गेला होता. तेथून ते अॅक्टिव्हा मोटारसायकलीवरून घरी परतत होते. त्या वेळी झायलो गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत अनिकेत शिंदेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. प्रणीत आणि आकाश यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्रणीतचा मृत्यू झाला. नालासोपारा पोलिसांनी चालक आशीष भाटिया याला अटक केली आहे.
बेकायदा रेती वाहतुकीवर छापा

वसई : बेकायदेशीर रेती वाहतूक करणारा ट्रक वालिव पोलिसांनी छापा घालून जप्त केला असून ८ ब्रास रेती जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. रात्री पोलिसांना सातिवली येथे गस्त घालत असताना हा ट्रक पळून जात असताना आढळला. त्यात ४० हजार रुपये किमतीची ८ ब्रास रेती होती. त्यांच्याकडे रेती वाहतुकीचा तसेच रेती उत्खनन करण्याचा कुठलाही परवाना नव्हता.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

भाईंदर : काशिमीरा येथे दहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला काशिमीरा पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलगी आई आणि तिच्या प्रियकरासह राहत होती. या मुलीची आई कामानिमित्त बाहेर गेली असता तिने आपल्या प्रियकराला मुलीचा सांभाळ करण्यास सांगितले होते; परंतु तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. हा प्रकार शेजाऱ्यांनी पाहिल्यावर ही घटना उघडकीस आली. आरोपीला १९ डिसेंबपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मोटारसायकल चोरणारी टोळी अटकेत

वसई : पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीचा छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यांनी चोरलेल्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई विभागाला दोन तरुण चोरलेली मोटारसायकल विकण्यासाठी नालासोपारा येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी नालासोपाऱ्याच्या दत्तनगर येथे सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून अन्य दोघांना अटक केली. त्यांनी वसई परिसरातून चोरलेल्या आठ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. अटक केलेल्या तरुणांच्या टोळीत एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.
सत्पाळा ग्रामपंचायत निवडणुकीत गैरप्रकार

१९ डिसेंबर रोजी निकाल

प्रतिनिधी, वसई
वसईतल्या सत्पाळा ग्रामपंचायत बिनविरोध जिंकणाऱ्या बहुजन विकास आघाडी या पक्षाविरोधात वसई न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीे असून १९ डिसेंबर रोजी याबाबतचा निकाल देण्यात येणार आहे.
वसईतलीे सत्पाळा ग्रामपंचायतीेच्या ११ जागा बहुजन विकास आघाडीने बिनविरोध जिंकून ही ग्रामपंचायत जिंकलीे होतीे. परंतु दबाव टाकून विरोधी पक्षाच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास लावले तसेच निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार केला गेला, असा आरोप जनआंदोनल समितीेच्या प्रफुल्ल ठाकूर यांनी केला होता. या विरोधात त्यांनी वसई दिवाणीे न्यायालयात याचिका दाखल केलीे आहे. मुदत संपल्यानंतर माघारीचे अर्ज स्वीकारणे, निवडणूक प्रकियेत गैरकारभार, पक्षपातीे वर्तन, माहितीे दडवून ठेवणे, उमेदवारांवर दबाव टाकणे, असे अनेक प्रकार केले गेल्याचा आरोप ठाकूर यांच्या वकिलांनी केला. या याचिकेवर न्यायालयात दोन्ही बाजूंनी सुनावणीे झालीे. १९ डिसेंबर रोजी याबाबत न्यायालय निर्णय देणार आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १५ प्रमाणे ग्रामपंचायत निवणुकीतीेल संदिग्धता, अनियमितता तथा भ्रष्टाचार या संदर्भात न्यायिक पुनर्विलोकन करण्याचे अधिकार दिवाणीे न्यायाधीशांना असल्याने न्यायालयात धाव घेतल्याचे जनआंदोलन समितीेने म्हटले आहे.