ठाणे - ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इयत्ता १२ वी पर्यंतच्या शाळांना गुरूवार (आज) आणि शुक्रवार अशा दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीकोनातून बुधवारी रात्री उशीरा ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी हा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्ह्यात बुधवारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना समोर येत आहेत. तसेच जिल्ह्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे येत्या दोन दिवसात अशाच पद्धतीने मुसळधार पाऊस झाला तर बदलापूर आणि आसपासच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीकोनातून ठाणे जिल्हाप्रशासनाने गुरूवार आणि शुक्रवारी अशा दोन दिवस इयत्ता १२ पर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी हा निर्णय घेतला.